इन्सुली कोनवाडा ते कोठावळेबांध मार्गावरील घटना ; सुदैवाने जीवितहानी टळली ; निकृष्ट कामाला जबाबदार कोण ?
प्रतिनिधी
बांदा
इन्सुली कोनवाडा ते कोठावळेबांध मार्गावरील माडभाकरवाडी येथे अकरा केव्ही विदयुत भारीत वीजवाहिनी तुटून पडली. ज्या ठिकाणी ही वाहिनी पडली त्या रस्त्यावरील डांबराचा काही भाग जळून गेला. नेहमीच वरदळीचा रस्ता असूनही सुदैवाने दरम्यान कोणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला. गेल्या सहा ते सात वर्षात ह्या लाईनचे काम केले असताना ही वायर मधोमध तुटून कशी पडली असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला. सदरचे काम निकृष्ट असल्याने असा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.येथील कोठावळेबांध कोनवाडा मार्गावरून अकरा केव्हीची लाईनने कोठावळेबांध येथील ट्रान्सफरवर विदयुत प्रवाह आणला आहे गेल्या सहा ते सात वर्षातच या लाईनचे काम करण्यात आले आहे. सदरचा मार्ग हा झाराप बायपास व जुना मुंबई गोवा महामार्ग यांना जोडतो. तसेच या मार्गावरून शाळकरी मुले ये जा करत असतात त्यामुळे या मार्गावर दिवसभर रहदारी असते. सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास अकरा केव्हीची लाइन तुटून डांबरी रस्त्यावर पडली. दरम्यान तेथून जाणाऱ्या एका पादचाऱ्याच्या निदर्शनास आले. विदयुत भारीत वायर डांबरावर पडल्याने डांबर जळत असल्याने त्याला संशय आला त्याने लागलीच आरडाओरड करून तेथून जाणाऱ्याना रोखले त्यामुळे अनर्थ टळला. यावेळी याबाबतची माहिती संबंधित विभागाला देऊन उपस्थित अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी जाब विचारला जर एखादी जीवित हानी झाली असती तर तुम्ही जबाबदारी घेतली असती का असा सवाल ग्रामस्थांनी केला. सायंकाळी ती वायर जोडणी करण्यात आली.









