बेळगाव : कर्जाच्या ओझ्यामुळे राज्यात तीन वर्षात 53 विणकरांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारच्या बदलत्या धोरणांमुळे विणकर व्यवसाय अडचणीत सापडला असल्याने विणकर व्यावसायिकांना बांधकाम कामगारांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी कर्नाटक राज्य विणकर सेवा संघाच्यावतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. शुक्रवारी सुवर्ण गार्डन परिसरात विणकरांनी जोरदार आंदोलन केले. राज्यातील आत्महत्या केलेल्या 53 विणकरांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, विणकरांना पूर्णपणे कर्जमाफी द्यावी, हातमाग विकास महामंडळात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून त्याची सखोल चौकशी करावी, 55 वर्षांवरील विणकरांना 5 हजार रुपये मासिक वेतन द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील शेकडो विणकर सहभागी झाले होते. बेळगाव जिल्हा हा विणकरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी चांगल्या दर्जाचे कापड व वस्त्रs तयार केली जातात. परंतु, वर्षानुवर्षे विणकर मात्र विकासापासून दूर आहे. विणकरांच्या समस्या मागील वर्षीही हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आल्या होत्या. यावर्षीही आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Previous Articleसरकारी गृहनिर्माण योजनांमध्ये 2 टक्के आरक्षण द्या
Next Article दिव्यांग कामगारांना नोकरीत कायम करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









