पुणे / प्रतिनिधी :
मूठभर लोकांच्या हातात संपत्ती आली म्हणजे नवा भारत नव्हे. नव्या भारताची सुरवात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, स्व. इंदिरा गांधी आणि स्व. राजीव गांधी यांनी केली होती, असे मत माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले. स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त राजीव गांधी स्मारक समितीकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदरांजली वाहताना ते बोलत होते.
यावेळी राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष गोपाळ तिवारी, आमदार संजय जगताप, कमल व्यवहारे, राजाभाऊ खराडे, भूषण रानभरे, धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक आयुक्त सुरेखा भणगे, प्राणीसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव, मुख्य आरोग्य निरीक्षक राजू दुलम्म, आरोग्य निरीक्षक प्रमोद ढसाळ उपस्थित होते.
दलवाई म्हणाले, आधुनिक जगाशी संपूर्ण देश जोडण्याचे काम राजीव यांनी केले. गरीब व्यक्तीच्या हातात आलेला फोन हा त्यांनी आणला आहे, ही लक्षात घेण्याची गरज आहे. त्यावेळी त्यांनी आणलेल्या संगणक क्रांतीवर अनेकांनी टीका केली. परंतु, आता संगणकाशिवाय पर्याय नाही. आज राजकारणात महिला पुढे आहेत, त्याचे श्रेय राजीव गांधी यांना आहे. त्यांनी पहिल्यांदा महिलांना 30 टक्के आरक्षण दिले.








