पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने बंदर अधिकाऱ्यांना निवेदन ; समुद्री वातावरण चांगले असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी
मालवण | प्रतिनिधी
सागरी हवामान चांगले आहे. याचा विचार करता जलक्रीडा व किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतुकीस मुदतवाढ मिळावी. अशी मागणी पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण, सिंधुदुर्ग यांच्या वतीने बंदर विभाग मालवण व प्रादेशिक बंदर अधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे गुरुवारी करण्यात आली आहे.
यावेळी पर्यटन महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर, राजेंद्र परुळेकर, चारुशीला आचरेकर, दामोदर तोडणकर, रुपेश प्रभू, मनोज खोबरेकर, मंगेश सावंत, पांडुरंग पराडकर, एजाज मुल्ला, अमोल सावंत, मनोज मेथर, रोहीत मेथर, विशाल गोवेकर, जॉन्सन रोड्रिंक्स, शेखर खोर्जे, स्वीटन सोझ, भूषण कासवकर, गणेश मसुरकर यासह अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.
बंदर विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जलक्रीडा व सिंधुदुर्ग किल्ला वाहतुक दरवर्षी २६ मे ते ३१ ऑगस्ट या मुदतीसाठी पावसाळी वादळी हवामानामुळे बंद ठेवण्यात येतात. परंतु आपल्या विभागाच्या सरसकट आदेश नियमामुळे जिल्ह्यातील सागरी पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांना दरवर्षी लाखो रुपये आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.
वास्तविक पाहता जिल्ह्यात दरवर्षी १० जून पर्यंत सागरी पर्यटनासाठी देशविदेशातील लाखो पर्यटक जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीवर भेट देतात हा काळ जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी महत्वाचा असून सागरी पर्यटनामुळे संपूर्ण जिल्ह्यात आर्थिक उलाढाल होत असते त्यामुळे सध्यस्थितीत जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वातावरणाचा विचार करता २६ मे ते ३१ मे पहिल्या टप्प्याची मुदतवाढ मिळावी व सागरी हवामान चांगले असल्यास १ जून ते १० जून पर्यंत दुसऱ्या टप्प्याची मुदतवाढ मिळावी, जिल्ह्यात पावसाळा १० जून नंतर सरासरी सक्रिय होत असतो या पूर्वी ही आपल्या माध्यमातून सागरी पर्यटनासाठी मुदतवाढ मिळाली आहे. तरी जलक्रीडा व किल्ला प्रवासी होडी वाहतुकीसाठी परवानगी देण्यात यावी. दर दिवशी हवामान अंदाज घेऊन परवानगी मिळाली तरीही चालेल. अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी चारुशीला आचरेकर यांनी पर्यटन व्यावसायिकांच्या वतीने आक्रमक भूमिका मांडली.









