किर्लोस्कर रोडवर जलवाहिनीला गळती : एलअँडटीचे दुर्लक्ष
बेळगाव : ऐन उन्हाळ्यात शहरात विविध ठिकाणी जलवाहिनी, व्हॉल्व्हला गळती लागून पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. एकीकडे पाच-सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तर दुसरीकडे विनाकारण पाणी वाया जाऊ लागले आहे. या प्रकाराकडे एलअँडटी लक्ष देणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. एलअँडटीकडून शहरात 24 तास पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार जलवाहिनी, जलकुंभ आणि नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दुसरीकडे मात्र शहरात विविध ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागून पाणी वाया जाऊ लागले आहे.
सध्या पाण्याची मागणी वाढली आहे. हिडकल आणि राकसकोप जलाशयातून पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलाशयातील पाणीपातळी टिकून आहे. मात्र शहरात विविध ठिकाणी जलवाहिनी, व्हॉल्व्ह आणि इतर कारणामुळे पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. मागील पंधरा दिवसांपासून किर्लोस्कर रोड येथील जत्तीमठ समोर जलवाहिनीला गळती लागून पाणी वाया जाऊ लागले आहे. मुख्य रस्त्यावरच पाणी वाहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे. तातडीने जलवाहिनीची दुरुस्ती करून वाया जाणारे पाणी थांबवावे, अशी मागणी स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी केली आहे.









