जिल्हा पानपट्टीचालक असोसिएशन बैठकीत निर्णय
सांगली : सध्या सांगली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने पानपट्ट्यांवर कारवाया केल्या जात असून पानपट्टी मालकांवर कलम ३२८ अंतर्गत गुन्हे नोंद केले जात आहेत. त्यामुळे पानपट्टीधारक घाबरून गेले आहेत. सदर कारवाया वाढताना दिसत असल्याने महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ आणि सांगली जिल्हा पानपट्टी असोसिएशनच्या वतीने गुरुवार १० रोजी सकाळी सांगलीतील आमराईमध्ये जिल्ह्यातील सर्व पानपट्टी चालकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाई थांबल्या नाहीत तर जेलभरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
प्रारंभी महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी म्हणाले, अन्न व औषध प्रशासनाने ताबडतोब या कारवाया थांबवाव्यात. यासह कलम ३२८ अंतर्गत गुन्हे नोंद करण्याचेही थांबवावे, अन्यथा जिल्ह्यातील सात हजार पानपट्टीधारक जेलभरो आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला.
अन्न व औषध प्रशासनाला कारवाई करायचीच तर ज्या ठिकाणी सुगंधी तंबाखू अथवा इतर सामान तयार होते, तिथेच कारवाई करून त्यांचे वितरण थांबवावं, आधीच कोरोना काळात नुकसानीत आलेले पानपट्टीधारक आता कुठे सावरत आहेत. त्यामुळे मोठे उद्योजक सोडून गोरगरीब पानपट्टीधारकांवर विनाकारण कारवाया करू नयेत. यासाठी आम्ही आता कोर्टाचीही लढाई लढणार आहोत, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
यावेळी पान असोसिएशन जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे, एकनाथ सूर्यवंशी, कार्याध्यक्ष युसुफ जमादार, खजिनदार राजू पागे, आदींसह जिल्ह्यातील पानपट्टी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








