_अक्षरघर आणि अक्षरोत्सव बाबत घेतली माहिती
तळेरे प्रतिनिधी
नवी मुंबई येथील आयटीएम कौशल्य विकास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.जयवंत शेलार यांनी तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अनोख्या अक्षरघराला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी या आगळ्यावेगळ्या संग्रहाचे कौतुक केले.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यात आलेले आणि राजापूरचे सुपुत्र डॉ.जयवंत शेलार यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते तथा नांदगाव विकास मंडळाचे अध्यक्ष गजानन रेवडेकर उपस्थित होते.यावेळी डॉ.शेलार यांनी या संग्रहामागची संकल्पना जाणून घेतली.तसेच संपूर्ण संग्रह पाहताना या जिद्दीचे आणि विविध प्रकारचा हा सांस्कृतिक ठेवा एकत्रितपणे रसिकांसाठी उपलब्ध करून देत असल्याबद्दल कौतुक केले.
यावेळी बोलताना डॉ.जयवंत शेलार म्हणाले की, तुम्ही घेतलेले प्रयत्न आणि संकलन पाहून आनंद झाला आणि तशीच अपेक्षा आहे.तर संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्याकडून या संग्रहाची सुरुवात कशी झाली? पहिले पत्र कुठले? आपण भारतीय पोस्ट कार्डवरच हे संदेश पत्र घेण्यामागचे कारण काय? आणि परदेशातील व्यक्तींशी संपर्क कसा साधला जातो? याबाबत तसेच, भविष्यात या संग्रहाचे नियोजन काय आहे? याबाबत सविस्तर माहिती डॉ. शेलार यांनी जाणून घेतली.
यातील अनेक संदेश आयुष्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून कसे पाहता येईल? याची वेगळी दृष्टी देत असल्याचे गजानन रेवडेकर म्हणाले. यावेळी डॉ.जयवंत शेलार आणि गजानन रेवडेकर यांना अक्षरोत्सव परिवाराकडून पोस्ट कार्डवरील सदिच्छा पत्र भेट देण्यात आले.
अक्षरघराला यांनी दिली भेट:-
तळेरे येथील अनोखी संकल्पना असलेल्या अक्षरघराला विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देऊन प्रशंसा केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. सुनिलकुमार लवटे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, फुटबॉल खेळाडू जयेश राणे, प्रसिध्द नाट्य समिक्षक अरुण घाडिगावकर, अभिनेते, दिग्दर्शक संजय खापरे, दिग्दर्शक दिपक कदम, गझलकार मधुसूदन नानिवडेकर, कवी गीतकार प्रसाद कुलकर्णी, साहित्यिक, कथाकथनकार वृंदा कान्बळी, आंतररष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नेमबाज रोहिणी हवालदार, कवी प्रा. प्रदिप पाटिल, ज्येष्ठ विचारवंत वैजनाथ महाजन, आंतरराष्ट्रीय कामगार नेते विद्याधर राणे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, अभिनेत्री प्राजक्ता वाडये, इस्लामपुरचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे, चित्रकार राज शिंगे, सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे, पर्यावरण अभ्यासक- लेखक धीरज वाटेकर, जीवन प्रबोधनी ट्रस्टचे संस्थापक सत्यवान नर, महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे विजय घरत, घुंगुरकाठीचे संस्थापक सतिश आणि सौ. सई लळीत, माजी राज्यपालांचे सहसचिव प्रा. विनायक दळवी यांच्यासारख्या अनेक व्यक्तींनी भेट देऊन अक्षरघराचे कौतुक केले आहे.









