पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन : योजनेचा शुभारंभ : कलाकार, कारागिरांना प्रमाणपत्रेही प्रदान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेचा शुभारंभ केला. देशाच्या विकासात ही योजना आशेचा नवा किरण असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. दिल्लीतील द्वारका येथील ‘इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर’ येथे आयोजित कार्यक्रमात मोदींनी या योजनेचा प्रारंभ केला. यावेळी त्यांनी विविध कलाकार आणि कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्रेही प्रदान केली.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. आज भगवान विश्वकर्मा यांची जयंती असून हा दिवस आपल्या पारंपरिक कारागिरांना आणि शिल्पकारांना समर्पित असल्याचे त्यांनी नमूद केले. भगवान विश्वकर्मा यांच्या आशीर्वादाने आजपासून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजना हस्तकौशल्य आणि साधने घेऊन काम करणाऱ्या लाखो कुटुंबांसाठी आशेचा नवा किरण म्हणून उदयास येत असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
पाठीच्या कण्याप्रमाणे योजनेचे महत्त्व
विश्वकर्मा योजनेची व्याप्ती खूप मोठी असून देशाच्या कानाकोपऱ्यातील गावात घडवलेल्या कलाकृतीला जगासमोर नेण्याचे हे एक शक्तिशाली माध्यम ठरणार असल्याचा दावाही पंतप्रधानांनी केला. या योजनेच्या माध्यमातून देशवासियांनी आपली कला, कौशल्ये जगासमोर दाखवावीत. भारताची स्थानिक उत्पादने जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी ही योजना मोठी भूमिका बजावेल. हजारो वर्षांपासून भारताच्या समृद्धीच्या मुळाशी असलेले मित्रच आपले विश्वकर्मा आहेत. जसा पाठीचा कणा आपल्या शरीरात भूमिका बजावतो, त्याचप्रमाणे हे विश्वकर्मा बांधव सामाजिक जीवनात भूमिका निभावत असतात असे ते पुढे म्हणाले.
स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन द्या!
या विश्वकर्मा दिनी आपण स्थानिक कारागिरांच्या कलांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता गणेश चतुर्थी, धनत्रयोदशी, दिवाळीसह अनेक सण येत आहेत. या सणासुदीमध्ये आत्मनिर्भरपणे बनविलेल्या आणि स्थानिक कारागिरांनी साकारलेल्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन मी करतो. व्होकल फॉर लोकलच्या माध्यमातून लोकांना स्थानिक विव्रेत्यांकडून आवश्यक वस्तू खरेदी करण्याची विनंती करतो. यामध्ये घर सजवण्याच्या वस्तूंपासून छोट्या वस्तूंपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असल्याचे पंतप्रधान पुढे म्हणाले.
द्वारका येथे उभारण्यात आलेली ‘यशोभूमी’ देशाला समर्पित करताना आज देशाला आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र राष्ट्रार्पण करण्याचा योगही अमूल्य असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. याच्या निर्मितीतून माझ्या विश्वकर्मा बंधू-भगिनींची तपस्या आणि तपश्चर्या दिसून येते, असेही ते पुढे म्हणाले.
‘यशोभूमी’मध्ये 11 हजार लोक एकत्र बसू शकतात. मुख्य हॉल आणि भव्य बॉलरूमसह ही 8 मजली इमारत 73 हजार चौरस मीटरपेक्षा जास्त जागेत बांधली गेली आहे. त्यात 15 अधिवेशन कक्ष आणि 13 बैठक कक्षही करण्यात आले आहेत. येथे केवळ बैठकाच आयोजित केल्या जाऊ शकत नाहीत तर परिषदा आणि प्रदर्शनदेखील आयोजित केली जाऊ शकतात.









