आयपीएलच्या उत्तरार्धात संघनिवडीची बैठक, 9 ते 19 जूनदरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी-20 सामने
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अतिशय खराब फॉर्ममधून जात असलेल्या विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांच्या आगामी टी-20 मालिकेतून विश्रांती मिळण्याची दाट शक्यता चर्चेत आहे. इंग्लंडच्या महत्त्वपूर्ण दौऱयापूर्वी विराटला ताज्या दमाने परतता यावे, यासाठी हा निर्णय घेतला जाणे अपेक्षित आहे. मागील 2 महिन्यात विराट कोहली सातत्याने बायो-बबलमध्ये राहत आला असून यादरम्यान त्याचा खराब फॉर्म जैसे थे राहिला आहे. आपल्या कारकिर्दीतील सर्वात खराब कालखंडातून मार्गोत्क्रमण करत असलेल्या विराटला मागील जवळपास 3 वर्षात एकही शतक झळकावता आलेले नाही.
दक्षिण आफ्रिकेचा संघ दि. 9 ते 19 जून या कालावधीत भारताविरुद्ध 5 टी-20 सामने खेळणार आहे. दिल्ली, कटक, विशाखापट्टणम, राजकोट व बेंगळूर येथे सदर सामने होतील. त्यानंतर भारतीय संघ जून-जुलैमध्ये इंग्लंड दौऱयावर जाणार आहे. यंदा आयपीएल हंगामात विराट कोहलीला 12 सामन्यात 19.63 ची सरासरी व 111.34 च्या स्ट्राईक रेटने केवळ 216 धावा जमवता आल्या असून माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यापूर्वीच विराटने ब्रेक घेणे आवश्यक असल्याचे जाहीरपणे म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी मालिकेसाठी आयपीएलच्या उत्तरार्धात संघनिवडीची बैठक होणे अपेक्षित आहे. उमरान मलिक, अर्शदीप सिंगसारख्या युवा खेळाडूंचा यात विचार होऊ शकतो.









