पूर्वाश्रमीचे राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या सुरक्षेत घट : नुकसानाची वसुली होणार
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळमध्sय शुक्रवारी राजेशाहीच्या समर्थनार्थ झालेल्या हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान केपी ओली शर्मा यांच्या सरकारची अॅक्शन जारी आहे. ओली सरकारने मोठा निर्णय घेत पूर्वाश्रमीचे राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या सुरक्षेत मोठा बदल केला आहे. त्यांच्या सुरक्षेकरता तैनात सर्व जवानांना बदलण्यात आले आहे, तसेच त्यांच्या सुरक्षेत मोठी घट करण्यात आली आहे. पूर्वी ज्ञानेंद्र शाह यांना 25 जवानांकडून सुरक्षा पुरविली जात होती, आता हे प्रमाण कमी करत 16 वर आणले गेले आहे. तसेच हिंसेत झालेल्या नुकसानाची भरपाई देखील त्यांच्याकडूनच वसूल करण्यात येणार आहे. हिंसक आंदोलनादरम्यान दगडफेक, एका पक्ष कार्यालयावर हल्ला, दुकानांमध्ये लूट, वाहनांना पेटवून देण्याच्या घटना घडल्या होत्या. पूर्वाश्रमीचे राजे ज्ञानेंद्र शाह हे स्वत:च्या खासगी मालकीच्या निर्मल निवासमध्ये वास्तव्यास आहेत. या निवासस्थानाबाहेर पूर्वी 25 जवान तैनात असायचे, परंतु शुक्रवारच्या हिंसेनंतर ही संख्या कमी करत 16 करण्यात आली आहे. राजेशाहीच्या समर्थनार्थ नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे.
हिंसेत झालेल्या नुकसानाची भरपाई देखील ज्ञानेंद्र शाह यांच्याकडून केली जाणार आहे. यासंबंधी काठमांडू महापालिकेने एक नोटीस जारी केली आहे. काठमांडू महापालिकेने ज्ञानेंद्र शाह यांना 7 लाख नेपाळी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा दंड ठोठावला आहे. ज्ञानेंद्र शाह यांना ही रक्कम लवकरात लवकर भरण्याची सूचना करण्यात आली आहे.
हिंसक आंदोलनात दोन जणांचा मृत्यू
शुक्रवारी आंदोलकांनी व्यापारी परिसर, रेस्टॉरंट, रुग्णालये, खासगी आणि शासकीय भवनांसमवेत 12 हून अधिक संपत्तींची तोडफोड केली होती. सुरक्षा कर्मचारी आणि राजेशाही समर्थक आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीत एका टीव्ही कॅमेरामनसमवेत दोन जणांचा जीव गेला होता. तर 110 जण जखमी झाले आहेत.
पूर्वाश्रमीच्या राजावर देखरेख
पूर्वाश्रमीचे राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या सुरक्षेत तैनात टीममध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या हालचलींवर देखील सरकारने करडी नजर ठेवली असल्याचे नेपाळच्या गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले. शुक्रवारी झालेल्या हिंसक घटनांसाठी ज्ञानेंद्र शाह यांना जबाबदार ठरविले जावे असे नेपाळी काँग्रेसने म्हटले आहे.
आंदोलनामागे ज्ञानेंद्र शाह?
देशभरात राजेशाही समर्थक आणि हिंदुत्ववादी प्रचारक, माजी पंतप्रधान आणि विरोधी पक्ष सीपीएन-माओवादी-सेंटरचे अध्यक्ष पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड यांच्या सर्व हालचालींमध्ये ज्ञानेंद्र शाह यांचाच हात असल्याचे सरकारचे मानणे आहे.
आरपीपीकडून इशारा
पोलिसांनी राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे (आरपीपी) दोन नेते धवल शमशेर राणा आणि रविंद्र मिश्रा यांना अटक केली आहे. पक्षाने या दोन्ही नेत्यांच्या मुक्ततेची मागणी केली आहे. जर 24 तासांत या दोन्ही नेत्यांची मुक्तता न झाल्यास पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यांवर उतरतील असा इशारा पक्षाने दिला आहे. शुक्रवारी काठमांडूमध्ये जे काही घडले त्याची जबाबदारी सरकारची असल्याचे आरपीपीने म्हटले आहे.









