उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांची मागणी
आचरा प्रतिनिधी
गणेश चतुर्थी आणि ईदच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांनी गुरुवारी आचरा पोलीस स्टेशनला भेट देत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखत उत्सव आनंदाने साजरे करण्याचे आवाहन केले. यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आचरा तिठा येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी सरपंच जेरान फर्नांडिस यांनी केली. आचरा परीसरात सुरू असलेली अवजड वाहतूक गणेश चतुर्थी कालावधीत बंद ठेवण्याची मागणी उपस्थितांकडून करण्यात आली. यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने आचरा परिसरातील महत्वाचे भाग लवकरच सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार असल्याचे पोलीस निरीक्षक पोवार यांनी सांगितलेया बैठकीला पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, सरपंच जेराॅन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, तसेच व्यापारी संघटना पदाधिकारी, चिरेखण व्यावसायिक, ट्रॅव्हलर्स मालक, पोलीस पाटील विठ्ठल धुरी, जगन्नाथ जोशी, दिनेश पाताडे, शांतता समिती मोहल्ला समितीचे सदस्य पोलीस कर्मचारी यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते
वाहतूक नियम मोडणा-यांवर दंडात्मक कारवाई होणार
गणेशोत्सवात चाकरमानी मोठ्या संख्येने गावी येत असतात. वाहनांची वर्दळही वाढत असते. या दृष्टीने वाहतूक कोंडी होऊ नये. उत्सवात कोणतेही विघ्न येवू नये यासाठी प्रत्येक वाहनचालकांने सार्वजनिक ठिकाणी आपल्या वाहनामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी आचरा पोलीस स्टेशन येथे आयोजित नियोजन बैठकीमध्ये केले. यावेळी त्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईही केली जाणार असल्याचे सांगितले.गणेशोत्सव निर्विघ्न आणि मोठ्या आनंदात उत्साहात साजरा व्हावा यादृष्टीने आचरा पोलीस स्टेशन तर्फे आचरा व्यापारी, रिक्षा चालक,ट्रॅव्हल्स,सहा आसणी रिक्षा चालक मालक यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.वेगवेगळ्या झालेल्या बैठकीत वाहतूक नियोजनाबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. गणेशोत्सवात आचरा तिठाच्या चारी बाजूंच्या रस्त्याने वाहतूक कोंडी ची समस्या निर्माण होत असते.यासाठी रस्त्यावर अडसर ठरेल अशा पद्धतीने कोणी वाहन उभे करत असेल अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच व्यापारी संघटनेच्या झालेल्या बैठकीत गणेशोत्सवात आणि आठवडा बाजारादिवशी वाहतूक कोंडी उद्भवू नये यासाठी व्यापारी वर्गाने योग्य ती खबरदारी घेत सहकार्य करण्यास सांगितले. या बैठकीला आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, मंदार सांबारी, खजिनदार जयप्रकाश परुळेकर, राजन पांगे, विद्यानंद परब,पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिनाक्षी देसाई, मिलिंद परब ,बबन पडवळ, मनोज पुजारे यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.









