सातारा :
संगममाहुलीच्या पुलाला ११० वर्ष नुकतीच पूर्ण झाल्याची चर्चा मध्यंतरी ऐकायला मिळाली होती. तर आता सातारा तालुक्यातील वड्थ आणि वाढे या पुलांचा १९० वा वाढदिवस दि. ३० जुन रोजी साजरा होत आहे. या पुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या परिसरातील स्थानिकांनी नवे पुल बांधून द्यावेत, अशी मागणी केली जात आहे. हे दोन्ही पुल दि. ३० जुन १८४५ साली लोकांच्या सेवेत आले होते. हे पुल सातारचे शहाजीराजे यांच्या औदार्याने बांधल्याचे त्या पुलावरील दगडावर रपष्ट उल्लेख केलेला आहे. तसेच पुलावरील माहिती देणारा दगड १८५३ च्या महापुरात वाहून गेला होता.

पुणे जिल्ह्यात इंद्रायणी नदीवरील साकव पुल वाहून गेल्यानंतर राज्य पुलाबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या. त्याचवेळी साताऱ्याचा संगम माहुलीचा पुलही चर्चेत आला होता. संगम माहुलीच्या पुलाला ११० वर्ष झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. नव्या पुलांचे बांधकाम धिम्या गतीने सुरु आहे. दरम्यान, सातारा तालुक्यातील वडूथ आणि वाढे हे दोन्ही पुल कृष्णा आणि वेण्णा नदीवर बांधले गेलेले आहेत. हे दोन्ही पुल नेहमी चर्चेचा विषय बनत असतात. त्या पुलावर अनेकदा आंदोलनेही विविध पक्षांनी केलेली आहे. पुलावर खड्डे पडलेले असतात. अपघात होत असतात. आता हे दोन्ही पुल दि. ३० जुन रोजी १९० वर्षाचे होत आहेत. त्या पुलावरच्या पाटीवर पुल सेवेत आल्याची तारीख ३० जुन १८४५ अशी आहे. त्याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थ मदन साबळे यांनी दिली.
हा पुल सातारचे शहाजीराजे यांच्या औदार्याने सेवेत आणण्यात आला तर १८५७ रोजी नदीला आलेल्या महापुरात माहिती देणारा दगड वाहून गेला. पुन्हा माहिती देणारा दगड लावण्यात आला असल्याचा उल्लेख आढळून येतो आहे. दरम्यान, त्या पुलाच्या भिंतीवर झाडी वाढली आहे. त्यावर पडलेले मोठ मोठे खड्डे आहेत. वाढे पुलावर तर पावसाळ्यात पाणी साठत असते. त्यामुळे पुलावर चिखलाचा राडाराडा झालेला असतो. पावसाळ्यात वाहन चालकांना वाहन चालवणे अवघड होत असते. वाढे फाटा पासून व वाढे गावातून पावसाचे येणारे पाणी पुलावरच येत असते. सध्या वाढे येथील पुलाचे ऑडिट स्ट्रक्चर होणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून या पुलावरील अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी मदन साबळे यांनी केली आहे.








