केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची स्पष्टोक्ती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकण रेल्वेचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होणार नसल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजपाचे नेते रावसाहेब दानवे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. कोकण रेल्वे मार्गाचे ज्या ठिकाणी दुहेरीकरण शक्य आहे त्याठिकाणी ते करण्यात आले आहे. अजूनही काहीठिकाणी कामे सुरू आहेत. या रेल्वेचा मोठा भाग हा डोंगरदऱयातून जात असल्याने बोगदे व पुलांची संख्या मोठी आहे. त्याच्या दुहेरीकरणाबाबत चर्चा सुरु असल्याचे दानवे यांनी सांगितले.
रत्नागिरीतील भाजपा कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दानवे पाटील बोलत होते. कोकण रेल्वे मार्गावरील गणपती उत्सवासाठीच्या रेल्वे गाडय़ा फुल्ल झाल्या असल्याचे म्हटले जाते. पण कोकणातील चाकरमान्यांसाठी या मार्गावर जेवढय़ा गाडय़ा लागतील तेवढय़ा रेल्वे गाडय़ा दिल्या जातील असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाचे संकट गेली दोन वर्ष देशात होते. त्या कालावधीत सर्वच सुविधा बंद होत्या. आता सर्व सुरळीत होत आहे. रेल्वेही रुळावर येत आहे. बंद असलेले स्टॉपही पुढील कालावधीत सुरु होणार आहेत. यातच कोळसा संकट उद्भवल्याने कोळशावरील 372 गाडय़ा बंद होत्या. बाहेरुन येणारा कोळसा महाग असल्याने देशांतर्गत कोळसा उत्खनन वाढवण्यात आली आहे. त्यामुळे हे संकट दूर होऊन लवकरच रेल्वे वेगाने धावेल असे त्यांनी सांगितले.
केंद्राने टॅक्स कमी केला पण राज्यात महाविकास आघाडीने टाळले
पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे केंद्राने टॅक्स कमी केला आहे. भाजपशासित राज्यांनी टॅक्स कमी केला. परंतु महाविकास आघाडीने टॅक्स कमी केला नाही. महाविकास आघाडी सर्व पातळ्यांवर अपयशी ठरली आहे. ज्या प्रश्नांवर महाविकास आघाडी अपयशी ठरली आहे त्याचे खापर भाजपावर फोडले जात आहे. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री दोन वर्ष घरात होते. घरात बसून माझे कुटुंब माझी जबाबदारी असल्याचे सांगत होते, अशी टिकाही त्यांनी केली. 2024 ला भाजप स्वबळावर लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ओबीसी, मराटा, धनगर आरक्षणाचे राज्य सरकार मारेकरी
ओबीसी आरक्षणाबाबतचा इंम्पिरिकल डाटा राज्य सरकारनेच दिला नाही. मध्यप्रदेश सरकारने गोळा करुन दिल्याने त्यांना आरक्षण मिळाले. राज्य सरकारने फक्त केंद्राकडे बोट दाखवण्याचे काम करीत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी केला. ओबीसी आरक्षण असो की, मराठा, धनगर आरक्षण राज्य सरकार या आरक्षणाचे मारेकरी असल्याचा आरोप दानवे यांनी केला. सामाजिक प्रश्न न सोडवता जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.









