तयारीला वेग, साहित्य रसिकांना उत्सुकता : बेळगाव-वेंगुर्ले मार्गापासून स्वागत कमानीची उभारणी
वार्ताहर/उचगाव
उचगाव येथे मराठी साहित्य अकादमी आयोजित 23 व्या मराठी साहित्य संमेलनाची बेळगावसह चंदगड, खानापूर, निपाणी तालुका आणि परिसरातील साहित्य रसिकांना उत्सुकता लागून राहिली आहे. संमेलन एक महिन्यावर येऊन पोहोचले असून आयोजकांनी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. परिसरात संमेलनाची चर्चा सुरू आहे. रविवार दि. 12 जानेवारी रोजी होणाऱ्या या संमेलनाच्या तयारीला वेग आला असून कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. संमेलनाच्या आयोजनामध्ये कोणतीही कसर राहू नये याची दक्षता घेण्यात येत आहे.
त्यासाठी जाहिरात व जनसंपर्क कार्यक्रम, निधी, स्वागत मंडप, सजावट व अन्य व्यवस्था, ग्रंथदिंडी, सांस्कृतिक, आरोग्य माहिती व प्रसारण, भोजन आदी समित्यांची रचना करण्यात आली आहे. सर्व समित्या, समित्यांचे पदाधिकारी आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. ग्रंथदिंडीसाठी वारकरी, भजनी मंडळ, लेझीम पथक, झांज पथक, ढोल-ताशा पथक यांना निमंत्रण देण्यात आले असून, त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. ग्रंथ दिंडीत सहभागी होण्यासाठी परिसरातील शाळा व महाविद्यालये तसेच सर्व युवक मंडळांना कळविण्यात आले आहे. संमेलनातील साहित्यिक कार्यक्रमांची उंची दरवषी वाढत चालल्याने परिसरात एक आगळे वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. सारा गाव संमेलनाच्या यशस्वीतेसाठी कामाला लागला आहे.
विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग
अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर, उपाध्यक्ष कृष्णाजी कदम-पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब देसाई, सेव्रेटरी एन. ओ. चौगुले कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना करत आहेत. बेळगावच्या या परिसरात होणाऱ्या या संमेलनासाठी भव्य शामियानाची उभारणी करण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली आहे. बेळगाव-वेंगुर्ले रोडवरील अॅप्रोच रोडपासून ते संमेलन स्थळापर्यंत स्वागत कमानीसंदर्भात ही सभामंडप उभारणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना सूचना करण्यात आल्या आहेत.
गावातील प्राथमिक मराठी शाळा, मळेकरणी हायस्कूल, स्वामी विवेकानंद हायस्कूलमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग या संमेलनामध्ये असतो. या संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थीवर्गाला कवी, लेखक जवळून पाहता येतात. त्यांचे विचार ऐकायला मिळतात. यासाठी दरवषी विद्यार्थी वर्गाला सामावून घेऊन त्यांचे विचार ऐकण्याची संधी दिली जाते. परिणामी गेल्या 22 वर्षांमध्ये मुले-मुली कविता करू लागले आहेत. शाळेत दिलेल्या विषयावर लेख, निबंध लिहिण्यात त्यांना सोपे होत आहे. हे तर संमेलनाचे खरे फलित आहे, असे मनोगत या भागातील अनेक पालक व ग्रामस्थांतून व्यक्त होताना दिसत आहे.
वाचनसंस्कृती वाढावी म्हणून संमेलनात येणारे पालक, शिक्षक, विद्यार्थी व साहित्यप्रेमी यांनी एक तरी पुस्तक खरेदी करावे या उद्देशाने अकादमी गेली 22 वर्षे सातत्याने पुस्तक प्रदर्शन भरवत आहे. यावषीही प्रकाशकांना निमंत्रण देण्यात येत आहेत. एकंदरीत या भागात उचगाव साहित्य संमेलनाचा दबदबा सुरू असून सर्वांच्या नजरा आता 12 जानेवारीच्या संमेलनाकडे लागून राहिल्या आहेत.









