बेळगाव : भाग्यनगर परिसरात रस्त्याशेजारील झाडांच्या बुंध्यांना आगी लावण्याचे प्रकार सुरू आहेत. झाडाच्या बुंध्यामध्ये कचरा तसेच पालापाचोळा टाकून पेटवून देण्यात येत आहे. यामुळे बरीचशी झाडे जळून खाक झाली असून भाग्यनगर परिसर भकास दिसू लागला आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. एकीकडे वृक्षांच्या संवर्धनासाठी लाखो रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे मात्र झाडे मुळासकट संपविण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी नागरिकांकडून केला जात आहे. भाग्यनगर हा परिसर शहरातील एक स्वच्छ व सुंदर परिसर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी मुबलक प्रमाणात लहानमोठे वृक्ष आहेत. या वृक्षांमुळे या परिसरामध्ये कायम सावली असते. परंतु, मागील काही दिवसांपासून वृक्षांच्या मुळांना आगी लावण्याचे प्रकार सुरू आहेत. मूळ जळाल्यास संपूर्ण वृक्षच सुकून खराब होत आहे. भाग्यनगर, अनगोळ परिसरात अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असून अशा प्रकारांना आळा घालणे गरजेचे आहे. एखादा वृक्ष मोठा होण्यास अनेक वर्षांचा कालावधी लागतो. परंतु, तो वृक्ष जाळण्यास केवळ एक ते दोन दिवसांचा कालावधी पुरेसा असतो. त्यामुळे प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Previous Articleओलमणी येथे वानरांचा धुमाकूळ
Next Article कॅम्प परिसरातील अवजड वाहतूक रोखली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









