प्रतिनिधी
बांदा
शहराच्या मुख्य बाजारपेठेतील गांधी चौक परिसरात लिंबाला टाचण्या टोचून, नारळ, हळद आणि कुंकू ठेवून अघोरी कृत्य करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज सकाळी दुकाने उघडण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे.या घटनेमुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून नेमका हा प्रकार कोणी केला? याचा शोध सुरू आहे. सकाळी गांधी चौकात काही व्यापारी आपली दुकाने उघडत असताना त्यांना रस्त्यावर नारळ, हळद, कुंकू आणि टाचण्या टोचलेले लिंबू दिसले. हे दृश्य पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आणि हा प्रकार तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. अंधश्रद्धा पसरवणारे आणि भीती निर्माण करणारे हे कृत्य कोणी केले? याबाबत कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे समाजात गैरसमज आणि भीती पसरते. त्यामुळे हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील व्यापारी आणि नागरिकांनी केली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तपास सुरू करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









