राजापूर :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवली तालुक्यातील खारेपाटण बॉक्सवेल ब्रिजवर बुधवारी रात्री ८.३० च्या दरम्यान दुचाकी व कंटेनर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात राजापुरातील दोघेजण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सचिन एकनाथ लाड (३५, रा. हसोळतळी, राजापूर) व तानाजी वामन शेळकर (३०, रा. कोडवशी शिळकरवाडी, राजापूर) अशी मृतं झालेल्या तरूणांची नावे आहेत.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर तालुक्यातील हसोळ येथील दुचाकीस्वार सचिन लाड हे तानाजी शेळकर यांच्यासमवेत आपल्या ताब्यातील हिरों होंडा कंपनीची (दुचाकी क्र. एम.एच. ०८ एक्स-४२५२) गाडी घेऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण येथे आले असता खारेपाटण बॉक्सवेलओव्हरफ्लाय ब्रिजवर कणकवलीच्या दिशेने आलेला व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरची (क्र. एम.एच. ४६ सी.एल. ३१५८) समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये सचिन लाड जागीच ठार झाले. तर त्याच्यासोबत असलेले त्यांचे मेव्हणे तानाजी शेळकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना १०८ रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार माने व मोहिते हे घटनास्थळी दाखल झाले. तर कणकवली येथून पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, हवालदार देसाई यांनी खारेपाटण येथे अपघातस्थळी तातडीने भेट देऊन अपघाताची माहिती जाणून घेतली. या प्रकरणी अधिक तपास खारेपाटण पोलीस करत आहेत.








