लांजा / प्रतिनिधी :
उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गावी आलेल्या घोसाळकर आणि तांबळे या दोन कुटुंबातील १४ आणि १५ वर्षे वयोगटातील दोघा अल्पवयीन मुला-मुलीचा भांबेड येथील मुचकुंदी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी २.३० च्या दरम्यान घडली.
या प्रकरणी लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील गोविळ बौद्धवाडी येथील रहिवासी असलेले आणि सध्या विरार ईस्ट येथे राहणाऱ्या संगीता तुकाराम पवार ही महीला आपली मुल मयुरी कमलेश घोसाळकर (वय १५) तसेच प्रतीक्षा कमलेश घोसाळकर (वय १२) यांच्यासह गावी आल्या होत्या. त्यांच्यासोबत सुशील गुंडाप्पा तांबळे (वय १४) आणि तन्मय गुंडाप्पा तांबळे ( वय १०, दोघे राहणार वरळी नाका मुंबई) हे देखील आले होते. संगीता पवार यांची आई वनिता तुकाराम पवार( वय ६६) यांचा १० एप्रिल रोजी वाढदिवस असल्याने त्या ९ एप्रिल रोजी इको कारने मुंबईहून गावी गोविळ बौध्दवाडी येथे आले होते.
मंगळवारी ११ एप्रिल रोजी दुपारी जेवण आटोपून हे सर्वजण मुचकुंदी नदीवर भांबेड येथे आंघोळ आणि कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत वनिता पवार तसेच इको कार चालक रुपेश कोंडीभाऊ कंदारे असे एकूण सातजण नदीवर गेले होते. कपडे धुणे सुरुवात केली असताना नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी प्रथम मयुरी घोसाळकर हिने नदीत उडी मारली. मात्र नदी पात्राचा व नदीतील मोठ्या कोंडीचा (कातळकडा) अंदाज न आल्याने ती पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. तिने घाबरलेल्या स्थितीत आपल्या आईला हाका मारल्या. तीचा आरडाओरडा ऐकून सुशील तांबळे याने या नदीपात्रात उडी मारली. मात्र, या दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात असून, लांजा पोलीस ठाण्यात सायंकाळी ७.११ वाजता दाखल करण्यात आले. याबाबत अधिक तपास यांचा पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव करत आहेत.








