पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत अवजड वाहनांना बंदी : आजपासून वाहतूक अधिकृतपणे सुरू : पुन्हा दहा पाईप घालून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था
वार्ताहर/कणकुंबी
बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्यावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पर्यायी पुलावरून चारचाकी आणि दुचाकी वाहनांना बुधवार सायंकाळपासून प्रवेश देण्यात आला आहे. गुरुवारपासून बेळगाव, चोर्ला, गोवा अशी चारचाकी आणि दुचाकी वाहतूक अधिकृतपणे सुरू होणार आहे. बुधवारी सायंकाळी 5 वाजता चारचाकी व सहा दुचाकी वाहनधारकांसाठी रस्ता खुला करण्यात आला. या मार्गावरील कुसमळी येथील ब्रिटिशकालीन पूल काढून त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन पुलाला सुरुवात केली आहे. परंतु पावसाळ्dयापूर्वी पुलाचे काम अर्धवट राहिल्याने नदीतून पर्यायी पूल बनवण्यात आला होता. या पर्यायी पुलावर पाण्याचा निचरा होण्यासाठी दहा पाईप घालण्यात आले होते. परंतु गेले दहा-बारा दिवस झालेल्या पावसामुळे मलप्रभा नदीचा पाण्याचा प्रवाह वाढल्याने तसेच तोराळी, देवाचीहट्टी व आमटे येथील बंधाऱ्याच्या फळ्dया काढल्याने पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे पर्यायी पूल वाहून जाणार अशी भीती निर्माण झाली होती. म्हणून शनिवार दि. 24 पासून हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता. बेळगाव, जांबोटी, गोवा अशी वाहतूक खानापूर व बैलूरमार्गे वळविण्यात आली होती. परंतु पुन्हा आज दहा पाईप घालून पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याने बुधवारी सायंकाळपासून केवळ चारचाकी व दुचाकी वाहनांना प्रवेश देण्यात आला आहे. नूतन पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
दुर्लक्षामुळे पुलाचे काम सुरू होण्यास विलंब
कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे नवीन पुलाला सुरुवात करण्यात आली आहे. वास्तविक शासनाने टेंडर काढण्यास उशीर केला. तसेच भूगर्भशास्त्र खात्याने देखील ब्लास्टिंग करण्यास अनुमती दिली नाही. त्यामुळे पुलाचे काम सुरू करण्यास उशीर झाला आणि त्यामुळेच पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी अर्धवट राहिले. गेल्या दहा-बारा दिवसापासून सुरू झालेल्या पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली. तसेच तोराळी, आमटे आणि देवाचीहट्टी-हब्बनहट्टी दरम्यान मलप्रभा नदीवर असलेल्या बंधाऱ्यांच्या फळ्dया काढल्याने पाण्याच्या प्रवाहात भरपूर वाढ झाली. त्यामुळे कुसमळी येथील मलप्रभा नदीत बनवलेला पर्याय पुल वाहून जाणार म्हणून भीती निर्माण झाली होती. नवीन पुलाचे काम सुरू झाल्यापासून गेले चार-पाच महिने याच पर्यायी पुलावरून वाहतूक सुरू होती. परंतु पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी अचानकपणे बंधाऱ्यांच्या फळ्dया काढण्याचा आततायीपणा केल्यामुळे मलप्रभा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाली. त्यामुळे कोणत्याहीक्षणी पर्याय पूल वाहून जाण्याची भीती निर्माण झाल्याने शनिवारी दुपारनंतर बेळगाव चोर्ला-गोवा अशी सर्व वाहतूक बैलूर व खानापूर मार्गे वळवली होती. परंतु सध्या त्या ठिकाणी पुन्हा पर्यायी फुलाला दहा पाईप घालून पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था केल्याने या मार्गावरील केवळ चारचाकी व दुचाकी वाहनांना मुभा देण्यात आली आहे.
बसही बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय
नवीन पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत अवजड वाहतूक तसेच बस वाहतूक सुद्धा पूर्णपणे बंद राहणार आहे. या रस्त्यावरून बस वाहतूक बंद झाल्याने विशेषत: कॉलेज किंवा माध्यमिक शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना बेळगावला जाऊन पोचण्यासाठी किंवा बेळगावहून घरी येण्यासाठी अधिक वेळ खर्च करावा लागत आहे. पहिले एक दोन क्लास देखील चुकत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाने याची खबरदारी घेऊन सध्या केवळ बससेवा सुरू करण्यास हरकत नाही, अशी मागणी पालक व विद्यार्थी वर्गातून होत आहे.









