पुणे / प्रतिनिधी :
अन्य राज्यांमध्ये निवडणूका लढवून त्यात किमान चार टक्के मते मिळवणे व लोकप्रतिनिधी निवडून येणे हा जो नियम आहे, त्यामध्ये थोडीशी कमतरता झाली असेल. परंतु, येत्या चार-सहा महिन्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये कामगिरी सुधारून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा परत मिळवू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे घडय़ाळ हे चिन्ह महाराष्ट्रापुरते कायम राहिल यात शंका नाही. पण देशातील वेगवेगळय़ा राज्यात आम्ही नागालँडमध्ये निवडणूका लढवल्या तिथे सात आमदार निवडून आले आहेत. लक्षद्वीपमध्ये आमचे खासदार आहेत. परंतु तिथे विधानसभा नाही. त्यामुळे ते राज्य गृहीत धरले जात नाही.
सर्व एजन्सीमार्फत जो वापर होतोय तो कोण व कसा करतेय त्याविषयी सतत भाष्य करण्याची आवश्यकता नाही. कारण याबाबत सर्वांना माहित आहे. परंतु राष्ट्रीय पातळीवरील दर्जा जाण्याचे जी घटना घडली आहे, त्यात आम्ही काही अटी पूर्ण करु शकत नाही. त्या अटी आम्ही भविष्यकाळात पूर्ण करू. ही घटना पक्षासाठी सेटबॅक आहे असे मला वाटत नाही. कारण घडय़ाळ या चिन्हाचा महाराष्ट्रातील हक्क आमचा गेलेला नाही. त्यामुळे येत्या चार-सहा महिन्यानंतर हा दर्जा पुन्हा आम्हाला प्राप्त होईल. या निर्णयाने महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता नाही.








