बिहारी कुटुंबातील चौघा जणांना अटक :: सौंदत्ती तालुक्यातील घटना
बेळगाव : सावत्र पित्याने साडेतीन वर्षांच्या बालकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी सौंदत्ती तालुक्यातील मरकुंबीजवळ घडली आहे. याप्रकरणी मुरगोड पोलिसांनी बिहारमधील चौघा जणांना अटक केली आहे. अत्यंत हिंस्रपणे छळ करून त्या बालकाचा खून करण्यात आला आहे. कार्तिक मांझी (वय साडेतीन वर्षे) राहणार बिहार असे त्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. कार्तिकच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून चौघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला असून मुरगोड पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. खून झालेला साडेतीन वर्षांचा बालक, आरोपी व फिर्यादी महिला हे सगळेच बिहारमधील आहेत. महेश्वर जगलाल मांझी, राकेश कोला मांझी, महेश गरबा मांझी, शिवनाथ रघु मांझी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण 30 ते 35 वयोगटातील आहेत. मरकुंबीजवळील एका कारखान्यात ते काम करीत होते. शुक्रवारी ही घटना घडली असून या प्रकरणाची खोलवर चौकशी करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले.
पोलीसप्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेल्या कार्तिकची आई रंगिला हिचे पहिल्या पतीसोबत भांडण आहे. पहिल्या पतीपासून कार्तिक हा मुलगा झाला. त्याच्याशी पटत नाही म्हणून रंगिलाने त्याला सोडून दिले. महेश्वर मांझी याच्याशी दुसरे लग्न केले. हे सर्वजण बिहारमधून कामानिमित्त मरकुंबीजवळ आले. पहिल्या पतीपासून झालेले अपत्य माझ्या घरात नको, त्याला कोठेतरी सोडून ये, असा महेश्वरने तगादा लावला होता. कार्तिक माझाच मुलगा आहे, तो माझ्याजवळच राहील, असे सांगत रंगिलाने त्याची मागणी फेटाळली होती. शुक्रवारी याच मुद्द्यावर भांडण होऊन महेश्वरने कार्तिकला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जळाऊ लाकडाने त्याच्या अंगावर चटके देण्यात आले. या हल्ल्यात कार्तिकचा मृत्यू झाला. बालकाच्या खुनासाठी इतर तिघा साथीदारांनी महेश्वरला मदत केली. त्यामुळे सर्व चौघा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुखांनी दिली. शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच बालकाचा मृत्यू कशामुळे झाला? हल्ल्यामुळे की जळाऊ लाकडाने पेटवल्यामुळे? याचा उलगडा होणार आहे.









