माजी खासदार राजू शेट्टी यांचा कारखानदारांना इशारा: बिद्री कारखान्यावर ‘स्वाभिमानी ‘ ची आक्रोश पदयात्रा
सरवडे प्रतिनिधी
गेल्या वर्षी बाजारात साखरेचा दर ३२०० रुपये क्विंटल होता. तेंव्हा कारखान्यांनी तीन हजार रुपये दर दिला. आता साखरेचा दर ३८५० रुपये क्विंटल झाला आहे. इथेनॉलचे एक टक्के वाढीव धरले तर १६१ रुपये प्रती टन वाढतात. हे साधे गणित धरुनच आम्ही गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला ४०० रुपयांची मागणी केली आहे. चारशेचा दुसरा हप्ता दिल्याशिवाय यंदा उसाचे कांडे तोडू देणार नाही ; असा सज्जड इशारा माजी खा. राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना दिला.
गेल्या वर्षी गाळप केलेल्या उसाला ४०० रुपये अतिरिक्त द्यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रोश पदयात्रेचे आयोजन केले आहे. ही पदयात्रा आज बिद्री ( ता. कागल ) येथील कारखान्यावर पोहोचली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. राजू शेट्टी यांनी मागण्यांचे निवेदन बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आम. के. पी. पाटील यांना दिले. यावेळी संचालक मधुअप्पा देसाई, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, कार्यकारी संचालक के. एस. चौगले आदी उपस्थित होते.
माजी खा. शेट्टी म्हणाले, गेल्या वर्षी हंगामाच्या सुरवातीला बाजारातील साखरेचे भाव पडले. तेंव्हा कारखान्यांनी साखरेच्या पोत्यावर काढलेल्या कर्जाचे व्याज वाढत आहे, याची जाणीव ठेवत आम्ही एफआरपीवर समाधान मानले. परंतू आता साखरेचा दर वाढल्याने कारखान्यांकडे पैसे शिल्लक आहेत. आमची मागणी व्यवहार्य असून ती मान्य न करणाऱ्या कारखान्यांतून साखरेचा एक कणही बाहेर पडू दिला जाणार नाही.याप्रसंगी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, युवा आघाडी जिल्हाधक्ष अजित पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बिद्री परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदन स्वीकारणारे के. पी. दुसरे चेअरमन
१७ ऑक्टोबरपासून सुरु झालेली ‘ स्वाभिमानी ‘ ची आक्रोश पदयात्रा शिरोळ व कागल तालुक्यातील प्रत्येक कारखान्यांवर जाऊन धडकली. याआधी केवळ शिरोळच्या दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनीच प्रत्यक्ष स्वाभिमानीचे निवेदन स्विकारले. अन्य कारखानदारांना आमचे निवेदन स्विकारावेसे वाटले नाही. त्यानंतर आता बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी थेट आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्विकारले ; याबद्दल आपण त्यांचे मनापासून आभार मानतो ; असे माजी खा राजू शेट्टी म्हणाले.
पालकमंत्र्यांना ४०० रुपयांचे गणित सोडवून देणार
स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आपल्या साखर कारखान्यावर सीए पाठवून द्यावा ; त्यांना सर्व माहिती देण्यास तयार असल्याचे विधान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले होते. याबाबत उद्या सोमवारी मंत्री मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व कारखानदारांना पत्र देणार असून ३१ मे नंतर किती साखर विकली आणि किती दराने विकली ते कारखान्यांनी जाहीर करावे. त्याचे विवरण द्यायला आपण तयार असून पालकमंत्र्यांसह अन्य कारखानदारांनाही आपण ४०० रुपयांचे गणित सोडवून देवू असे शेट्टी यावेळी म्हणाले.









