चौदा गावच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
उत्रे प्रतिनिधी
ऐन उन्हाळ्यात यवलूज ते कसबा ठाणे (ता.पन्हाळा) या बंधाऱ्या दरम्यानचे कासारी नदीची पाणी पातळी खूपच खालावली असून जागोजागी नदीचे पात्र कोरडे पडले आहे.यामुळे कृषी पंपाचे ‘फुटबॉल’ उघड्यावर पडले आहेत. परिणामी या बंधारा पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या चौदा गावच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाटबंधारे विभागाने नदीत पाणी सोडून पाणी पातळीत वाढ करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
कासारी नदीला गेळवडे या मध्यम प्रकल्पासह,पडसाळी, नांदारी, पोंबरे, कुंभवडे, केसरकर या लघु पाटबंधारे प्रकल्पात पाणी पुरवठा केला जातो. या नदीवर उन्हाळ्यात पाणी अडवण्यासाठी जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत.या नदीवरील यवलूज पोर्ले हा शेवटचा बंधारा आहे.या बंधारा पाणलोट क्षेत्रात यवलूज,पडळ, सातार्डे, माजगाव,पोर्ले,खोतवाडी,देवठाणे, शिंदेवाडी, माळवाडी, उत्रे, पिंपळे, आळवे, वाघवें,पन्हाळा गड आदी चौदा गावांचा समावेश आहे.तीन वर्षांपूर्वी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाले आहे.पण पाटबंधारे विभागाकडून या बंधारा क्षेत्रात नदीमध्ये पुरेशा दाबाने पाणी सोडले जात नाही.यामुळे वारंवार नदीची पाणीपातळी खूपच खालावते .सद्यस्थितीत नदीचे पात्र जागोजागी कोरडे पडले आहे. कृषी पंप ‘ फुटबॉल ‘व सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेचे इंटेक्स चेंबर उघडे पडले आहेत.परिणामी पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.एकीकडे उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्या आहेत.तर दुसरीकडे पिकांना जादा पाण्याची गरज भासत असताना नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.तसेच नदीपात्रात वाळू व माती भराव पडल्याने नदी पात्र उथळ बनले आहे यामुळे पाणीसाठा कमी होत आहे. नदी पात्रात खोलगट करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
‘कसबा ठाणे बंधाऱ्यातून पाणी सोडले असून येत्या दोन दिवसांत यवलूज बंधाऱ्या पर्यंत नदीच्या पाणी पातळी वाढ होणार आहे यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही.असं पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता प्रदीप पाटील यांनी म्हंटल आहे.
कासारी नदीची पाणी पातळी फारच कमी झाल्यामुळे उत्रे ते पन्हाळा पाणी पुरवठा योजना चार दिवसांपासून बंद आहे. नळपाणी पुरवठा जॅकवेलच्या पंपाला पाणी नाही यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.”









