रत्नागिरी :
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. पण याच तयारीचा एक अनोखा आणि पारंपरिक रंग रत्नागिरी तालुक्यातील लाजूळ गावात पहायला मिळतो. इथे गणपतीच्या स्वागताची तयारी जागर आणि ‘सापड काढणे’ या पूर्वापार चालत आलेल्या परंपरांनी केली जाते.
जागर म्हणजेच गावातील एकोपा आणि श्रद्धेचं प्रतीक मानले जाते. येणाऱ्या गणेशोत्सवाच्या तयारीचा भाग म्हणून नारळी पौर्णिमेच्या दिवशी गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावदेवाच्या मंदिरात गणपती बाप्पासाठी खास पोवती तयार केली. ही पोवती म्हणजे केवळ एक धागा नसून ती गावदेवाच्या आशीर्वादाचं आणि गावातील एकोप्याचं प्रतीक मानली जाते. या पोवत्यांना गावदेवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून देवाला रूप लावले जाते. त्यानंतर याच पोवत्या प्रत्येक घरातील गणपतीला आणि देवघरातील देवांना अर्पण केल्या जातात. ही परंपरा गावातील प्रत्येकाला एकात्मतेच्या धाग्यात बांधते. आजही गावागावात ही पूर्वापार प्रथा सुरू आहे.
या सोबतच सापड काढणे म्हणजेच स्वच्छतेचा संदेश देणारी परंपरा आजही अनेक गावांमध्ये जपली जात आहे. गावात ‘सापड काढणे’ ही आणखी एक महत्वाची परंपरा आहे. गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मंदिराच्या बाहेर वाढलेले गवत काढले जाते. यात गावातील तरुण मुले, तसेच वयस्कर मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. हा केवळ साफसफाईचा उपक्रम नसून स्वच्छतेचं महत्व जपण्याची व बाप्पाच्या स्वागताची एक सुंदर पद्धत आहे. यामुळे मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर राहतो. अशाप्रकारे लाजूळ गावातील लोक आपल्या पारंपरिक पद्धतींनी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
- एकत्र येण्याची अनोखी संधी
‘जागर’ आणि ‘सापड काढणे’ या दोन्ही परंपरांमुळे लाजुळ गावातील लोक एकत्र येतात. यामुळे केवळ गणेशोत्सवाची तयारीच होत नाही तर गावकऱ्यांमधील एकोपा आणि सामुदायिक भावना अधिक दृढ होते. प्रत्येकजण आपल्या परीने या कामांमध्ये सहभागी होऊन सणाचा आनंद द्विगुणीत करतो, याचा या सण परंपरेतून प्रत्यय येतो.








