सरवडे प्रतिनिधी
वाळवे खुर्द ता कागल येथील शेतकरी दिलीप पांडुरंग खुटाळे हे आज सकाळी शेतातील कामे आटोपून कालव्याजवळून परतत असताना अचानक बैल घाबरल्याने बैल, गाडी व शेतकरी कालव्यात कोसळले. बैलांना सापतीने बांधले असल्याने पाण्यात हालचाल करता आली नाही. त्यामुळे पाण्यात बुडून दोन्ही बैलांचा अंत झाला. मात्र सुदैवाने शेतकरी पोहत बाहेर आला. कष्टकरी शेतकर्याच्या दोन बैलांचा मृत्यू झाल्याने सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
वाळवे खुर्द येथील शेतकरी दिलीप खुटाळे हे सकाळी खाणीचे शेत नावाच्या शेतात मशागत करण्यासाठी गेले होते. काम आटोपून बैलगाडीने ते कालव्याच्या काठावरील रस्त्याने घरी चालले होते. अचानकपणे बैल घाबरल्याने कालव्यात पडले. गळ्यामध्ये बैलगाड्याचे सापती असल्यामुळे बैलांना पोहून बाहेर येता आले नाही.मात्र शेतकरी कसाबसा बचावला. त्यांनी आरडाओरडा करुन लोकांना गोळा केले. लोकांनी बैलांना वाचविण्यासाठी धडपड केली मात्र बैलांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला होता. घटनेची माहिती गावात कळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. बैलांचे मृतदेह पाहून हळहळ व्यक्त होत होती. गरीब शेतकऱ्याच्या दोन बैलांचा अचानक मृत्यू झाल्याने शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.









