किरण गावडे यांनी घेतला पुढाकार : जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग

वार्ताहर /कणकुंबी
कणकुंबी येथे चौदा वर्षांनी नुकत्याच पार पडलेल्या माउली देवी यात्रोत्सवाला आलेल्या भक्तगणांकडून व यात्रेतील दुकानदारांनी टाकलेल्या केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शतावरी रिसॉर्ट, श्री माउली विद्यालय व ग्रामपंचायत कणकुंबी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दि. 8 ते 15 फेब्रुवारी असे आठ दिवस चाललेल्या यात्रेत्सवाला जवळपास आठ ते दहा लाख लोकांनी हजेरी लावली होती. यावेळी अतिशय मोठ्या प्रमाणात जिकडे तिकडे प्लास्टिक पिशव्या, केरकचरा, प्लास्टिक बॉटल व इतर सर्वप्रकारचा कचरा मंदिराच्या परिसरात विखुरलेला होता. गेले चार-पाच दिवस गावातील दिवसा पाळीव जनावरे व रात्री जंगली जनावरे या कचऱ्यामध्ये फिरत असत. जनावरांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून स्वच्छता मोहीम हाती घेऊन केरकचऱ्याची विल्हेवाट लावणे जऊरीचे होते. त्यासाठी शतावरी रिसॉर्टचे मालक किरण गावडे यांनी पुढाकार घेऊन शतावरी रिसॉर्ट, श्री माउली विद्यालय, प्राथमिक शाळा तसेच ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये जवळपास अडीचशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
मंदिराच्या एक ते दोन किलोमीटर परिसरात प्लास्टिक केरकचरा व इतर सर्व प्रकारचा कचरा विखुरला होता. यात्रा काळात आलेल्या भाविकांनी टाकलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी रामेश्वर मंदिर परिसर तसेच माउली मंदिराचा परिसर व पार्किंग व्यवस्था करण्यात आलेला परिसर, या सर्व ठिकाणाचा केरकचरा जमा करून तो जाळण्यात आला. प्लास्टिकयुक्त कचरा खाण्यासाठी जनावरे तसेच जंगली प्राणी दिवसाढवळ्या या ठिकाणी फिरत होते. जनावरांना हा केरकचरा घातक असतो. तसेच या कचऱ्यामुळे निसर्गाचासुद्धा समतोल बिघडू शकतो. म्हणून त्याची विल्हेवाट लावणे हे आपलं कर्तव्य आहे. स्वच्छ भारत अभियान या उपक्रमांतर्गत देशपातळीवर अनेक उपक्रम राबविले जातात. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भावी नागरिक आहेत. तेव्हा प्रत्येकाने याची जाणीव ठेवून आपले घर, परिसर व गाव स्वच्छ केले तर देश स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा आपण सर्वांनी प्रामाणिकपणे ही जबाबदारी पार पाडूया, असे मार्गदर्शन शतावरी रिसॉर्टचे मालक व बेळगाव जिल्हा शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण गावडे यांनी प्रारंभी सर्व विद्यार्थ्यांना केले. य् ाावेळी कणकुंबी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष रमेश खोरवी, श्री माउली विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर व त्यांचे सहकारी टी. एल .बिर्जे, बी. एम. शिंदे, एस. आर. देसाई, विजय गावडे, नेताजी घाडी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एस. आर. अवताडे तसेच कणकुंबी गावचे प्रतिष्ठित पंच व देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम गावडे, संजय वरंडेकर, संतोष नाईक, देमू गवस व इतर उपस्थित होते. य् ाा स्वच्छता मोहीम उपक्रमानंतर माउली मंदिराकडे सर्व विद्यार्थ्यांना शतावरी रिसॉर्टच्यावतीने अल्पोपहार देण्यात आला. याप्रसंगी शतावरी रिसॉर्टमधील सर्व महिला इतर कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते.









