पुणे / प्रतिनिधी :
गांधी, लोहिया, आंबेडकर यांचे विचार वरवर वेगवेगळे असले, तरी या तिन्ही तत्त्वांमध्ये मानवतावाद हे एक सूत्र आहे. त्यामुळे धर्म व राजकारण झपाटय़ाने अशुद्ध होत असतानाच्या आजच्या काळात हे मॉडेल म्हणजे काळाची गरज ठरते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 88 व्या स्मृतिदिनानिमित्त आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत हरिभाऊ साळवे आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संजीवनी हनुमंतराव कदम यांना डॉ. सबनीस यांच्या हस्ते ‘रमाईरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाई महोत्सव समितीचे अध्यक्ष ऍड. प्रमोद आडकर होते. माजी नगरसेविका लता राजगुरू, राष्ट्रीय स्मारकचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, कुणाल राजगुरू, रमाई स्मारक समितीच्या मुख्य निमंत्रक प्रेरणा गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. सबनीस म्हणाले, हिंदू धर्म वाईट नाही. तर त्यातील कर्मकांड वाईट आहे. बौद्ध धर्मात जात, कर्मकांड शिरले असेल, तर तेही वाईटच आहे. धर्माचे शुद्धीकरण हे आव्हान असून, ते आज आवश्यक आहे. राजकारण आज अशुद्ध बनले आहे. 2024 मध्ये निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हिंदूराष्ट्राची संकल्पना आणली जात आहे. त्यापासून सावध रहावे लागेल. पुन्हा मोदीच पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. ते होऊ नयेत, अशी माझी इच्छा आहे. परंतु, माणसे धर्मांध बनली आहे. धर्माच्या कर्मकांडाला ती बळी पडत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शुद्ध धर्माचा विचार मांडला. शुद्ध धर्माचे स्वातंत्र्य त्यांनी मान्य केले. हिंदू धर्माचे स्वांतत्र्य तर त्यांना मान्यच आहे. मात्र, हिंदू राष्ट्राचे स्वातंत्र्य त्यांना मान्य नाही. म्हणूनच आज राजकारण, धर्मकारण अशुद्ध अवस्थेत बेतले जात असताना धर्माधर्मात संवाद वाढायला हवा.
साळवे यांनी लोहिया, गांधी, आंबेडकर यांच्याविषयीचा विचार मनोगतात मांडला. हे विचार वरवर वेगळे वाटतात. त्यात विसंवादही खूप आहेत. मात्र, तिन्ही वादात मानवतावाद आहे. लोहिया समाजवादी असले, तरी मानवतावादी आहेत. माणुसकी हाच त्यांचा धर्म आहे. महात्मा गांधी हे महात्माच आहेत. तो महात्मा हिंदू धर्माचा असला, तरी धर्माच्या भिंती त्यांनी बाद केल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष. बौद्ध धर्माचे वलय त्यांच्याभोवती असले, तरी संविधानातील बाबसाहेब हे सर्वसंवादी, सर्वस्पर्शी, सेक्युलर, सर्वसमावेशक असे असून, समस्त भारताने त्यांना वंदन करावे, असे आहेत. या तीन महापुरुषांच्या तत्त्व विचारांच्या पातळीवरचा संवाद वाढावयास हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रतिगामी शक्ती माजता कामा नये, त्यांचे राज्य येता कामा नये, ही साळवे यांची तळमळ आहे. म्हणून तीन मॉडेलने एकत्र येण्याची गरज त्यांना वाटते. ती योग्यच आहे. मला सर्व धर्मातील चांगुलपण एकत्र यावे. सर्व महापुरुषांचे सामर्थ्य एकत्र पुजावे. सर्व संस्कृतीतील प्रवाहातील पुण्य एकत्र यावे. राजकारण आज ना उद्या संपणार आहे. मोदी अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत. मोदींच्या, त्यांच्या पक्षाच्या बऱ्याच उणिवा आहेत. काँग्रेसच्याही उणिवा आहेत. मात्र, आज या निष्कलंक महापुरुषांचे निष्कलंक विचार घेऊन पुढे गेले पाहिजे. या सर्वांना मर्यादा असू शकता. तथापि, समाजकल्याणासाठी जे महापुरुष कामी येतात, खर्ची पडतात, त्यांची पुण्याई सर्व समाजाला नेहमी वंदनीय राहते. या सर्वांची, त्यांच्या विचारांची बेरीज करण्याची आज गरज आहे.
लोहिया, गांधी, आंबेडकरी विचार हाच पर्याय : साळवे
साळवे म्हणाले, देशाला आज प्रतिगामी शक्तींपासून धोका आहे. या शक्तींविरोधात नेटाने उभे रहायला हवे. त्याकरिता आधी गांधी, लोहिया व आंबेडकरांचा विचार समजून घेतला पाहिजे. गांधीवाद, लोहियावाद व आंबेडकरवादी विचार एकत्रित करून दुसरा पर्याय देणे, ही आजच्या काळाची गरज आहे. ही तिन्ही मॉडेल एकत्र आल्यास आजच्या काळाची आव्हाने आपण पेलू शकतो.








