पुणे / प्रतिनिधी :
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळय़ावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात अशी घटना यापूर्वी घडली नव्हती. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळय़ाचे योग्य नियोजन करून हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसे घडले नाही. वारकऱ्यांवरील पोलीस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी आपला संताप व्यक्त केला.
यासंदर्भात आपली भूमिका मांडताना पवार म्हणाले, महाराष्ट्राला पंढरपूरच्या आषाढी वारीची गौरवशाली परंपरा आहे. आषाढी वारी आणि आळंदीहून निघणारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे आपल्या महाराष्ट्राच्या अध्यात्म, भक्ती परंपरेचे वैभव आहे. दरवर्षी वारीसाठी हजारो वारकरी आळंदीत येतात. वारी आणि प्रस्थान सोहळय़ाचे योग्य नियोजनही केले जाते. वारकरीही या नियोजनाला सहकार्य करत असतात. परंतु यंदा कुठेतरी चूक घडलेली दिसत आहे. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे हे घडल्याचे दिसत आहे. ही संपूर्ण घटना दु:खदायक, तशीच मनाला चीड आणणारी आहे. अशी घटना यापुढे घडू नये, यासाठी पूर्ण काळजी घेण्यात यावी.
कुठल्याही आद्यात्मिक कार्यात आणि पंढरपूर वारीसारख्या सोहळय़ात सहभागी होताना सर्वांनी राजकीय हेतू बाजूला ठेवावेत. ईश्वरभक्ती आणि वारकऱ्यांची सेवा हाच हेतू मनात ठेवून वारीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.








