संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नावाजलेल्या अशा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएससारख्या व्यावसायिकदृष्ट्या आघाडीवरील कंपनीने व्यावसायिक अस्थिरता व नजिकच्या काळातील अनिश्चित परिस्थिती यापायी कंपनीअंतर्गत मध्यम व उच्चस्तरीय स्तरांवर काम करणाऱ्या सुमारे 12000 कर्मचाऱ्यांना सेवा मुक्त करण्याची शक्यता व्यक्त केली. एरवी व्यावसायिक संदर्भात व व्यवस्थापन शैली व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एरवी सहानुभूतीपूर्वक भूमिका राखणाऱ्या टीसीएस व्यवस्थापनाच्या या प्रस्तावित कर्मचारी कपातीच्या संदर्भातील निर्णयाचे परिणाम देशांतर्गत माहिती तंत्रज्ञान व संगणकीय सेवा क्षेत्रातील कंपनी आणि कर्मचारी या उभय स्तरांवर उमटणे स्वाभाविक होते.
या संदर्भात प्रामुख्याने व सर्वप्रथम उमटलेली प्रतिक्रिया म्हणजे टीसीएस व्यवस्थापनाची वर नमूद केलेली व कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या संदर्भात आलेली प्रतिक्रिया म्हणजे ही प्रस्तावित भूमिका म्हणजे सद्यस्थितीत विशेषत: भारतातील संगणक क्षेत्र आणि संबंधित विषयाशी निगडित अशा अस्थिरतेची द्योतक समजायला हवी.
या क्षेत्रातील जाणकारांच्या मते सध्या आपले माहिती तंत्रज्ञान व त्याच्याशी संबंधित क्षेत्र हे मोठे बदल अनुभवीत आहे. या बदलांमुळे भारतातील संगणकीय सेवा उद्योगात तंत्रज्ञानापासून माहितीची देवाण-घेवाण व आर्थिक व्यवहार या साऱ्यांवरच मोठे परिणाम होत आहेत. याचे परिणाम भारतासह जागतिक स्तरावर होत आहेत. यामध्ये विविध संशोधनांच्या नेमक्या व मोजक्या वापरासह आर्थिक निर्बंधांवर भर देण्यात येत असून त्याचा अपरिहार्य परिणाम कर्मचारी आणि त्यांच्या संख्येवर होत आहे.
दरम्यान संगणक क्षेत्र आणि व्यवसायाला त्यांच्या फायदेशीर अस्तित्वासाठी कार्यालय, कर्मचारी, तंत्रज्ञान व आर्थिक दृष्टिकोन या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून त्यानुसार ध्येयधोरणाची नव्याने आखणी वा प्रसंगी फेरआखणी करावी लागते. वाढती स्पर्धा हा मुद्दा सुद्धा सर्वांसाठी महत्त्वाचा ठरतो. त्यातच भर पडते ती संगणक सेवा क्षेत्रातील वाढत्या अपेक्षांची व त्यांची पूर्तता करण्यासाठी यापूर्वी न वापरलेल्या उपाययोजनांचा विचार आणि वापर करणे अपरिहार्य ठरते. यामध्ये कार्यालयीन जागा व कामकाजापासून कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेपर्यंत सर्वच प्रमुख मुद्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात येतो.
याच दरम्यान संगणक सेवा क्षेत्रातील अन्य प्रमुख कंपनी असणाऱ्या इन्फोसिस कंपनीने त्यांच्या कंपनीत कुठल्याही प्रकारची कर्मचारी कपात होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांनी जाहीर केलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता व कर्मचाऱ्यांच्या नव्या आणि नव्या स्वरुपातील कौशल्य विकासाद्वारे कंपनीच्या कर्मचारी कपातीच्या संदर्भातील चर्चेला पूर्णविराम दिला आहे. एवढेच नव्हे तर एकीकडे कर्मचारी कपातीची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावतानाच इन्फोसिस आगामी वर्षभरात सुमारे 20000 नव्याने उत्तीर्ण झालेल्या संगणक पदवीधरांना प्रशिक्षणार्थी म्हणून घेणार असल्याची केलेली जाहीर घोषणा हाच मुळी सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात प्रामुख्याने चर्चेचा विषय झाला आहे.
कंपनीची व्यवसाय आणि व्यवस्थापनाची दिशा स्पष्ट करताना सलील पारेख यांनी स्पष्ट केलेली बाब म्हणजे नव्या व्यावसायिक गरजा व व्यवस्थापन पद्धती यांचा व्यवसायानुकूल भर देण्यावर त्यांचा भर कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिकाधिक परिणामकारक वापर करून व्यवसाय वाढविण्यावर राहणार आहे. त्याचवेळी कृत्रिम बुद्धिमत्ता हे क्षेत्र सर्वार्थाने नवे असल्याने त्यातील कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांची सर्वत्र वानवा आहेच, कौशल्याच्या संदर्भातील नेमकी हीच गरज व त्याच्याशी निगडीत आव्हाने लक्षात घेऊनच कंपनीने नव्याने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी उमेदवारांना प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून नव्या कर्मचाऱ्यांची निवड करण्याच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 17000 प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
सुरुवातीलाच नमूद केल्यानुसार सध्या जगाच्या पाठीवरच माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र उद्योग क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर व्यवसाय स्वरुपात व एकूणच कार्यपद्धती आणि कार्यशैली, व्यावसायिक धोरण व विस्तार, कर्मचाऱ्यांचे कामकाज त्याचे स्वरुप व नव्या व्यवसाय पद्धतीतील त्यांचे विद्यमान व अपेक्षित जबाबदारी यावर मोठ्या प्रमाणावर विमर्ष होत असून त्यानुसार संबंधित कंपनी वा व्यवस्थापनाच्या गरजांनुसार आवश्यक असे बदल करणे अपरिहार्य ठरत आहे. संगणक क्षेत्रातील या महत्त्वाच्या व्यावसायिक बदल व प्राधान्यक्रमांमध्ये प्रामुख्याने पुढील मुद्यांचा समावेश करता येईल.
व्यावसायिक फायद्यासाठीची तीव्र स्पर्धा- इतर व्यवसायांप्रमाणेच संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान व्यवसायामध्ये स्पर्धा असणे अपरिहार्य असले तरी सध्या या स्पर्धेची व्याप्ती आणि तीव्रता प्रकर्षाने वाढली आहे. या स्पर्धेत पण सध्या अधिकाधिक व्यावसायिक फायदा मिळविण्यावर जगात सर्वत्र भर दिला जात असून त्यासाठी प्रसंगी अतिरेकी व्यावसायिक नीती-पद्धतींचा वापर केला जात आहे.
व्यावसायिक फेररचना- बदलत्या व्यावसायिक गरजा, वाढती स्पर्धा व विविध स्वरुपांची आव्हाने या साऱ्यांना एकाचवेळी तोंड देण्यासाठी व्यवसाय, व्यवस्थापन व कंपनी, कर्मचारी या क्षेत्रांची फेररचना व पुनर्रचना करणे सध्या पूर्वी कधी नव्हते तेवढे अपरिहार्य झाले आहे. यासाठी एक प्रगत व आवश्यक उपाय व उपाययोजना म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्र अग्रक्रमाने पुढे येत असून त्याचा वापर आवश्यकच नव्हे तर अपरिहार्य देखील आजघडीला ठरलेला आहे.
कर्मचाऱ्यांचे सोडून जाणे- कंपन्यांसाठी परिणामारक स्वरुपाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे राजीनामे हे मोठे आव्हान असते. सद्यस्थितीत व वाढत्या व्यावसायिक स्पर्धेला तोंड देताना विशेषत: एरवी सुद्धा कामाच्या व कौशल्यप्राप्त कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवणे हे संगणक शास्त्र उद्योगासाठी आवश्यक असले तरी सध्या हीच बाब बदलत्या परिस्थितीत या व्यवसाय क्षेत्रासाठी अत्यावश्यक ठरली आहे.
याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाकडे शस्त्र आणि शास्त्र या उभय दृष्टिकोन आणि भूमिकांसह पाहिले जाणे फार गरजेचे आहे. कंपनी, कंपनीचे कामकाज व काम करणारे कर्मचारी या साऱ्यांसाठी नवे बदल व बदलांचा अपरिहार्य महत्त्वाचा भाग म्हणून सर्वांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्र आणि तंत्रज्ञान समजून घेतले त्यातून कर्मचाऱ्यांची व पर्यायाने कंपन्यांची उपयुक्तता निश्चितपणे व्यवसायपूरक ठरणारी आहे.
दत्तात्रय आंबुलकर








