ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2030 पर्यंत देशातील सर्पदंश मृत्यू अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशातील पहिली सर्पविष पेढी आणि परीक्षण केंद्र महाराष्ट्रात उभे राहणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी यासंदर्भात माहिती दिली.
मंत्रालयात जागतिक सर्पदंश जागृती दिनानिमित्त झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले, जगातील सर्वाधिक सर्पदंश आणि मृत्यू भारतात होतात. भारतात महाराष्ट्रात ही संख्या सर्वाधिक आहे. सर्पदंश मृत्यू अर्ध्यावर आणण्याच्या दृष्टीने वैज्ञानिक पूर्वतयारीचा भाग म्हणून विविध 52 विषारी सर्पाच्या विषाचा अभ्यास करण्याकरिता पायाभूत संरचना उभी करावी लागेल. त्याचाच एक भाग म्हणून सर्पविष पेढी तसेच परीक्षण केंद्र उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिक वाचा : राणेंना हायकोर्टाचा दणका; ‘अधीश’ बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश
नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे याच चार जातींच्या सर्पाच्या विषांचा अभ्यास आजवर झाला आहे. पण भारतात सापांच्या 260 प्रजाती असून त्यातील 52 विषारी आहेत. या उर्वरित सापांच्या विषाचा आत्तापर्यंत पुरेसा अभ्यासच झालेला नाही. या सर्व जातींच्या सापांच्या विषावर एकच प्रभावी प्रतिविष निर्माण करण्याच्या दृष्टीनेही संशोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठीच राष्ट्रीय सर्पविष संशोधन केंद्र, सर्पविष पेढी आणि परीक्षण केंद्र स्थापन होणे आवश्यक आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.








