मालवण / प्रतिनिधी
भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवेदन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंद असलेले रेल्वे आरक्षण केंद्र (TBA) सेवा पुन्हा सुरू व्हावी. याबाबत मागणी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवेदनद्वारे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सन १९९९ पासून मालवण येथे कोटा सिस्टीम मधून आम्हाला विनातक्रार कन्फर्म रेल्वे तिकिटे उपलब्ध होत होती, परंतु करोना काळात ही सेवा अचानक रेल्वेकडून बंद करण्यात आली. सदर सेवा अद्याप चालू झालेली नाही. त्यामुळे मालवण पंचक्रोशीतील कोकणी लोकांना ऑनलाईन तिकिटे मिळणे अशक्यप्राय झाले आहे.
चालू असलेली ही तिकिट सेवा अत्यंत महत्त्वाची ठरली होती. मात्र विना तक्रार अशी आरक्षण सेवा केंद्रे रेल्वे बोर्डाने बंद झाल्याने कोकणी माणसाची फार मोठी गैरसोय झाली आहे.
याप्रश्नी आपण न्याय मिळवून देऊ शकता. तरी रेल्वे मंत्रालय यांच्या माध्यमातून न्याय मिळवून द्यावा.
मुंबई वरुन परत येण्यासाठी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटा मिळणे आवश्यक आहे. त्याबाबतही आपण पाठपुरावा करावा. अशी मागणी करण्यात आली आहे.









