चंदगड रेस्क्यू टीमकडून अथक प्रयत्न : घटनास्थळी कुटुंबीयांचा शोक : हळहळ व्यक्त
वार्ताहर /तुडये
शनिवारी सायंकाळी हाजगोळी (ता. चंदगड) गावाशेजारील चाळोबा मंदिरा पाठीमागील बाजूला असलेल्या तिलारी धरणाच्या खोल पाण्यात बुडालेल्या दोन सख्ख्या भावांचे मृतदेह शोधण्यास चंदगड रेस्क्यू टीमला तब्बल आठ तासांच्या शोधमोहिमेनंतर यश आले. शनिवारी कुटुंबीयासह या परिसरात फिरण्यास आलेल्या रेहान अल्ताफ खान (वय 15) आणि त्याचा लहान भाऊ मुस्ताफा अल्ताफ खान (वय 12) हे दोघे बुडाले होते. चंदगड रेस्क्यू टीमकडून शनिवारी रात्री 8.30 पर्यंत मृतदेह शोधण्याचे प्रयत्न झाले. मात्र, अंधार आणि पावसामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली होती.
रविवारी सकाळी 8.30 वाजल्यापासून चंदगड रेस्क्यू टीमचे एकनाथ म्हाडगूत आणि श्रीपाद सामंत यांनी पाण्यातील मृतदेह शोधले. सकाळी 10 पासून एचईआरएफ रेस्क्यू टिमने शोधमोहीम सुरू केली. पाण्यात कॅमेऱ्याद्वारे मृतदेह शोधण्याचे काम श्रीपाद सामंत आणि स्वीमर पद्मप्रसाद हुल्ली यांनी केले. दुपारी 2.45 वाजता रेहान याचा मृतदेह हाती लागली. त्यानंतर सव्वातीन तासाच्या शोधानंतर सहा वाजता मुस्ताफा याचा मृतदेह रेस्क्यू टीमच्या हाती लागला. दोन्ही मृतदेहांना पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. सकाळपासूनच कॅम्प बेळगाव येथील कुटुंबीय, मित्रमंडळी व तुडये, हाजगोळी येथील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. चंदगडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, साहाय्यक निरीक्षक अंकुश करांडे, साहाय्यक निरीक्षक अर्जुन जाधव, पोलीस हवालदार रामदास किल्लेदार, भदरगे हे दुर्घटनास्थळी थांबून होते. चंदगड रेस्क्यू टीमचे एकनाथ म्हाडगूत, श्रीपाद सामंत, विशाल परब, अविनाश गिलबिले, एचईआरएफचे प्रेसिडंट बसवराज हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मप्रसाद हुल्ली, अभिषेक येळ्ळूर, राजू टक्केकर, संतोष दरेकर, विशाल पाटील यांनी शोध मोहिमेत सहभाग घेतला.
पत्नीने ओढणी टाकून पतीला पाण्याबाहेर काढले
तिलारी धरणात एक-दोन फूट अंतरातच 20 ते 30 फूट खोल पाणी आहे. रेहान आणि मुस्ताफा कमी पाण्यात खेळत होते. त्यावेळी वडील अल्ताफ हे पाण्यात बुडताना पाहून दोन्ही मुले घाबरून वडिलांच्या बाजूला जाताना खोल पाण्यात बुडाली. यावेळी अल्ताफ हेही बुडत होते. त्याचवेळी पत्नीने मोठ्या धाडसाने आपली ओढणी टाकत पतीला पाण्याबाहेर काढण्यास यशस्वी ठरल्या. मात्र पोटच्या दोन्ही मुलांना वाचविण्यास त्या अपयशी ठरल्या. दिवसभर शोकाकूल वातावरणात घटनास्थळी हे कुटुंब शोक व्यक्त करताना पाहताना प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत होता. शोधमोहीम दरम्यान पावसानेही हजेरी लावल्याने व्यत्यय आला. दोन्ही मृतदेह चंदगड ग्रामीण रुग्णालयाकडे पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आले.









