खासगी संस्थेचे काम समाधानकारक नसल्याने सरकारचा निर्णय : चालक म्हणून स्थानिक कर्मचाऱ्यांना नेमण्यात येणार
बेळगाव : आजाराने जर्जर झालेल्या रुग्णांना अर्थात सिरियस रुग्णांना ऊग्णालयात त्वरित दाखल करून उपचार मिळवून देण्यासाठी 108 वाहनाची (आरोग्य कवच) सोय करण्यात आली आहे. मागील दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या सेवेत काही त्रुटी आढळून येत असल्याने खासगी संस्थेकडे असलेली ही सेवा आता सरकार आपल्या ताब्यात घेणार आहे. सरकारने नव्याने कमांड आणि कंट्रोल केंद्र स्थापन करण्यासाठी अलिकडेच मंजुरी दिली आहे. हे केंद्र तातडीचे कॉल स्वीकारून 108 रुग्णवाहिकेला कळविणे व रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे काम करणार आहे. आयएएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात कमांड व कंट्रोल केंद्राचे काम चालणार आहे. तातडीचे कॉल स्वीकारणे, रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे तसेच वैद्यकीय प्रक्रिया सुलभ करून देण्याची जबाबदारीही केंद्राची राहणार आहे. या सेवा पार पाडण्यासाठी सरकारने 3,631 कर्मचाऱ्यांची नेमणूक करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सध्या 108 रुग्णवाहिका सेवा खासगी संस्था चालवित आहे. पण, संस्थेचे काम समाधानकारक नसल्याने सरकारने ही सेवा स्वत: चालविण्याचा निर्णय घेतला आहे. चामराजनगर जिल्ह्यात सरकारने प्रायोगिक तत्त्वावर चालविलेली ही सेवा यशस्वी झाल्याने या सेवेचा विस्तार राज्यभरात करण्यास सरकार पुढे आले असून तयारी चालविली आहे. मध्यवर्ती केंद्रातूनच कमांड व कंट्रोल केंद्राचे कार्य चालणार आहे. उपलब्ध माहितीनुसार या येजनेसाठी 3,631 कर्मचारी नेमणुकीला सरकारने मंजुरी दिली असून यातील 1700 कर्मचारी तातडीची वैद्यकीय सेवा देणारे असणार आहेत. कॉल स्वीकारण्यासाठी केंद्र, राज्य कार्यक्रम नियोजन विभाग तसेच जिल्हा कार्यक्रम विभाग सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात वाहनावर चालक म्हणून स्थानिक कर्मचाऱ्यांना नेमण्यात येणार असून यामुळे रुग्णाला तातडीची सेवा मिळणे शक्य आहे. स्थानिक वाहनचालकांना आपल्या भागाची माहिती असल्याने ते रुग्णांना ऊग्णालयात त्वरित पोचवू शकतील, असे मतही व्यक्त होत आहे.
जिल्हास्तरावर केंद्र बनविण्यात येणार
108 वाहनसेवा सरकार ताब्यात घेणार असून हे स्वागतार्ह आहे. जिल्ह्यात सध्या 56 रुग्णवाहिका (108) आहेत. ही सेवा रुग्ण़ांना आणखी जलद मिळण्यासाठी जिल्हास्तरावर केंद्र बनविण्यात येणार आहे.
-डॉ. ईश्वरप्पा गडाद, जिल्हा आरोग्याधिकारी









