कोल्हापूर :
बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या कारवाईवत एकच आरोपी वारंवार सापडत असेल तर अशा आरोपींवर मोका सारखी कारवाई करण्याच्या विचारात राज्यशासन असल्याची माहिती आरोग्य तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयासंदर्भातील आढावा बैठक झाल्यानंतर ते बोलत होते.
आबिटकर म्हणाले, पीसीएनडीटी अॅक्टनुसार आरोग्य विभाग प्रभावीपणे काम करत आहे. बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कोल्हापुरात छापेमारी सुरू आहे. यातून चांगले रिझल्ट येत आहेत. कोल्हापुरात मुलींचा दर कमी होत आहे., ही बाब शोभनीय नाही. येथे आणखीन छापे होणे गरजेचे आहे. यंत्रणा आधिक गतीमान झाली पाहिजे. संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे यासाठी कायदामध्ये बदल केले जात आहेत.
यापूर्वी बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या खबऱ्यास एक लाख दिले जात होते. आता तक्रारदार महिलेला देखील एक लाख रुपये देण्यात येणार असून दोन दिवसांत याबाबत अध्यादेश काढला जाणार आहे. यासंदर्भातील विभागासह पथकाला वाहनासह सुरक्षेतीचेही सुविधेसाठी निधी दिला जाणार आहे.
- कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय करणार नाही
काही स्थानिक डॉक्टरांचे पथकावर दबाव टाकत असून काही ठिकाणी अशा प्रकारे तपासणी होत आहे परंतू कार्यवाही होत नसल्याची चर्चा असून याबाबत विचारले असता मंत्री आबिटकर म्हणाले, मुलींचा दर कमी होत आहे, ही गंभीरबाब आहे. ही एक सामाजिक जबाबदारी आहे. जाणूनबुजून कोणी कारवाई करण्यात हालगर्जीपणा करत असतील तर त्याच्यातील वास्तविक्ता शोधू. संबंधितांवर कारवाईसाठी हायगय करणार नाही.
- जीबीस नियंत्रणात, आरोग्य यंत्रणा सतर्क
जीबीएसचे रूग्ण सुरुवातीला पुण्यात मोठ्या प्रमाणात सापडले. यावेळी आपण घाबरलो मात्र आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना दिल्यानुसार सर्वजण त्याचा पालन करत आहेत. हा आजार संसर्गजन्य नाही. यामुळे या आजाराचे रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात आपल्याला यश आलेला आहे. गेल्या महिन्याभरात 200 च्या आसपास रुग्ण सापडले आहेत. 97 टक्के रूग्न उपचार घेवून घरी गेले आहेत. 8 ते 9 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रतिकारशक्ती कमी असणे, व्याधीग्रस्त असणाऱ्यांना या आजाराचा धोका जास्त आहे. कोल्हापुरात एकाचा या आजाराने मृत्यू झाला आहे. ही घटना दुर्देवी असून भविष्यात अशा घटना होणार नाहीत यासाठी आरोग्य विभाग सतर्क आहे.
- ‘शक्तीपीठ’साठी जनभावनाचा विचार होणे आवश्यक
शक्तीपीठ महामार्गबाबत महायुतीच्या आमदारांमध्ये मतमतांर असल्याबाबत विचारले असता मंत्री आबिटकर म्हणाले, शक्तिपीठ महामार्गात मतमतांतर असणे साहजिक आहे. राज्य सरकारकडून महामार्ग करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. शक्तीपीठ महामार्ग हा प्रकल्प झाला पाहिजे. मात्र, हा महामार्ग ज्या मतदारसंघातून जाणार आहे. तेथील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत. याबाबतची वस्तुस्थिती वरीष्ठांपर्यंत पोहचवू.
- राज्यभर पक्ष संघटन मजबूत करणार
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात पुन्हा नवीन सरकार स्थापन झाला आहे. यामुळे शिवसैनिकात उत्साहाचा वातावरण आहेत. कोकणातील देखील काही दिग्गज नेते शिवसेनते सहभागी होत आहेत. अशा पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा आम्ही स्वागत करू. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राज्यभर काम करणार आहोत. यामुळे जिह्यातून देखील कोण येतील त्यांचे स्वागतच असेल, असेही पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले.








