अपघातात 1 ठार 30 जखमी
वार्ताहर/ शिरवळ
सातारा ते पुणे जाणाऱया महामार्गावर शिरवळ (ता.खंडाळा) गावच्या हद्दीतील पुणे थांब्याजवळ आयशर टेम्पो आणि ट्रक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने असलेल्या आयशर टेम्पोने कोल्हापूर जिह्यातील भादोले येथील दिंडी सोहळ्यासाठी चाललेल्या ट्रक्टर ट्रॉलीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडक दिल्याने धडकेमध्ये 1 वारकरी ठार तर 30 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. धडक इतकी भीषण होती की ट्रॉलीतील वारकरी हवेत फेकले गेले. या अपघातामध्ये मयाप्पा कोंडिबा माने (वय 45, रा,भादोले ता.हातकणंगले जि.कोल्हापूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मारुती भैरवनाथ कोळी (वय 40 रा. लाहोटे ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) हे मृत्यूशी झुंज देत आहेत. सदरील घटना रविवार दि. 19 जून रोजी मध्यरात्री तीन वाजण्याच्या दरम्यान घडली.
कोल्हापूर जिह्यातील भादोले, लाहोटे येथील ह.भ.प. वासकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱया श्री. भद्रेश्वर भाविक मंडळाची दिंडी क्रं.1 व 7 हा दिंडी सोहळा आळंदी ते पंढरपूर असा पायी दिंडी सोहळ्याकरीता आळंदी येथे ट्रक्टर (क्रं- एमएच-10-एवाय-5705) ट्रॉलीमधून प्रवास करीत होते. यावेळी सदरील ट्रक्टरला दोन ट्रॉल्या जोडलेल्या होत्या. यामध्ये महिलांसह 43 वारकरी ट्रक्टर ट्रॉलीमध्ये आळंदीकरीता प्रवास करीत होते. दरम्यान, ट्रक्टर ट्रॉली सातारा ते पुणे जाणाऱया महामार्गावर शिरवळ (ता.खंडाळा) गावच्या हद्दीत आली असता पाठीमागून तरकारी घेऊन पुणेकडे भरधाव वेगात निघालेल्या आयशर टेम्पो (क्रं.एमएच-45-एएफ-2277) ने महामार्गावरुन दिंडी सोहळ्याकरीता निघालेल्या ट्रक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक देत चालकाचे नियंत्रण सुटून महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या विद्युत खांबाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर टेम्पो महामार्गावर पलटी झाला. ट्रक्टर ट्रॉलीमधील वारकरी महामार्गावर हवेत उडत गंभीर जखमी झाले तर ट्रॉलीचा चक्काचूर झाला. यावेळी ट्रॉलीमधील लोखंडी बार मायप्पा माने व मारुती कोळी यांच्या पोटामध्ये घुसल्याने ते गंभीर जखमी झाले.
दरम्यान, यावेळी अपघातामध्ये भादोले, लाहोटे येथील इंद्रजित पांडुरंग पाटील(वय 50), बाळासो ज्ञानू तावडे, प्रमिला वसंत पाटील (वय 55), शिवाजी दत्तू सलगर(वय 72), यशवंत सुराप्पा शिंदे (वय 67), कृष्णात उर्फ बाप्पू यादव(वय 55), शिवाजी माने(वय 70), भिकाजी सखाराम माने, महिपती महादेव पाटील (वय 65), सचिन रामचंद्र नांगरे (वय 36), शिवाजी यशवंत नांगरे(वय 70), आनंदा युवराज माने(वय45), रघुनाथ भैरु माने (वय 48), शिवाजी धोंडिराम येडके(वय50), महादेव ज्ञानू पाटील(वय 65), रमेश राजाराम पाटील(वय 57), शोभा नाना माने(वय40), वसंत लखु माने (वय 60),तानाजी राजाराम तावडे(वय 47), विमल बाळासो तावडे(वय 60), कल्पना पाटील(वय50), विलास आनंदा पाटील (वय 65) व इतर दोन वारकरी असे तीस वारकरी गंभीर तर अकरा वारकरी किरकोळ जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच तातडीने शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक आंदेलवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल बारेला, संजय पंडित, मोरे, सचिन वीर, नितीन महांगरे, सुनील मोहरे, मदन कुंभार, सजंय सपकाळ व सारोळा महामार्ग मदत केंद्राच्या कर्मचाऱयांनी धाव घेत मदतकार्यामध्ये मोलाचा वाटा उचलला. यावेळी अपघातानंतर अपघातामधील वाहने बाजूला घेताना दोन्ही बाजूकडील वाहतूक तब्बल चार तास खोळंबली होती. यावेळी शिरवळ पोलीस स्टेशनच्या व सारोळा महामार्ग मदत केंद्राच्या पोलीस कर्मचाऱयांनी वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱहाडे, वाई पोलिस उप अधीक्षक डॉ. शीतल जान्हवे-खराडे, खंडाळा प्रभारी गटविकास अधिकारी घोलप यांनी भेट दिली. दिंडी चालक पांडुरंग कागले यांनी शिरवळ पोलिसात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आंदेलवार करीत आहेत. v
अपघात घडल्यावर तत्काळ जखमींना युवक व नागरिकांच्या मदतीने शिरवळ पोलीसांनी पुणे जिह्यातील किकवी व सातारा जिह्यातील शिरवळ येथील 108 रुग्णवाहिकेमधून व खासगी रुग्णवाहिकेमधून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेमधून शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले. टेम्पो ड्रायव्हर ज्ञानेश्वर मारुती भोसले (रा. महिम ता. सांगोला) आणि क्लिनर वेळ पाहून घटना स्थळावरून फरार झाले. गंभीर जखमी असलेल्या मयाप्पा माने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर गंभीर जखमी मारुती कोळी यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.








