यजमान श्रीलंकेचा सलग दुसरा पराभव : सुर्या, यशस्वी, हार्दिकची फटकेबाजी
वृत्तसंस्था/ डाम्बुला
रविवारी झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय संघाने यजमान श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 161 धावा केल्या. श्रीलंकेकडून कुशल परेराने सर्वाधिक 53 धावा केल्या तर पथुम निसंकाने 32 धावा केल्या. इतर फलंदाज मात्र ठराविक अंतराने बाद होत गेल्याने लंकेला मोठे आव्हान उभे करता आले नाही. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच षटकातील तीन चेंडूनंतर पावसाला सुरुवात झाली. बराच वेळ पाऊस न थांबल्याने सामना 8 षटकांचा खेळवण्यात आला. डकवर्थ लुईसन नियमानुसार भारताला 48 चेंडूत 78 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. यानंतर भारतीय संघाने विजयी लक्ष्य 6.3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यातच पूर्ण केले. यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 30, सुर्यकुमार यादवने 26 तर हार्दिक पंड्याने नाबाद 22 धावा फटकावल्या. आता, उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना दि. 30 रोजी खेळवण्यात येईल. भारताकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या रवि बिश्नोईला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.









