खेड /प्रतिनिधी
कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी बोगद्यानजीक रविवारी सायंकाळी मातीचा भराव रुळावर कोसळून ठप्प झालेली रेल्वे वाहतूक वीस तासानंतरही पूर्वपदावर आलेली नाही. मुसळधार पावसामुळे रात्रीच्या सुमारास दरडही कोसळली. एक पोकलेन, जेसीबी व अन्य साधन साधनसामुग्री तसेच शंभरहून अधिक कामगार यांच्या सहाय्याने दरड व मातीचा भराव हटवण्याचे काम सोमवारी सकाळी युद्धपातळीवर सुरू होते. तब्बल १५ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून यात वंदे भारत एक्सप्रेस समावेश आहे. २० रेल्वे गाड्या अन्य मार्गे वळवण्यात आल्या आहेत. चार ते पाच एक्सप्रेस गाड्या त्या त्या स्थानकात थांबवण्यात आल्या असून प्रवाशांचे हाल झाले आहेत.









