खडक गल्लीतील पंच-नागरिकांचे पोलीस आयुक्तांना निवेदन
बेळगाव : चार दिवसांपूर्वी खडक गल्ली परिसरात घडलेल्या दगडफेक प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. सोमवारी गल्लीतील पंच, प्रमुख व महिलांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर यासाठी मोर्चा काढला. खडक गल्ली, जालगार गल्ली, भडकल गल्ली, चांदू गल्ली, चिरागनगर, घी गल्ली परिसरात गेल्या दहा वर्षांत कोणत्याही प्रकारच्या अप्रिय घटना घडल्या नाहीत. यापुढेही अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावी. शुक्रवार दि. 3 ऑक्टोबर रोजी संदल मिरवणुकीत प्रक्षोभक घोषणा देऊन वातावरण खराब करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
परवानगी घेतलेल्या मार्गाऐवजी ऐनवेळेला मिरवणुकीचा मार्ग बदलून गोंधळ निर्माण करणाऱ्या आयोजकांवरही कारवाई करावी. पोलीस अधिकाऱ्यांनी गल्लीतील पंच व नागरिकांबरोबर बैठक घेऊन यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना राबवावी. या घटनेसंबंधी चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर सोशल मीडियाविरुद्ध कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे ऐकल्यानंतर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी घटनास्थळी परिस्थिती निवळण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या दोन्ही समाजाच्या प्रमुखांचे अभिनंदन केले. सोशल मीडियावर कोणी विश्वास ठेवू नये, यापुढे होणाऱ्या मिरवणुकांच्या वेळी पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी तेथे असतील, याची काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
संवेदनशील भागात नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. रात्रीच्या वेळी बीट पॉईंट वाढविण्यात येणार आहेत. जातीय सलोखा राखण्यासाठी पोलीस दलाला स्थानिक नागरिकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या सेवेसाठीच आम्ही आहोत. कोणत्याही परिस्थितीत सोशल मीडियावरील चुकीच्या बातम्या पाहून निर्णय घेऊ नये. दगडफेक प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी आदी अधिकारी उपस्थित होते.









