गिरीश चोडणकर, अमित पाटकर यांची विधाने
प्रतिनिधी/ पणजी
अनेक दिवसांच्या उपचारांनंतर गोमेकॉतून डिस्चार्ज मिळालेले सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांनी खुद्द मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री यांच्यावर केलेले गंभीर आरोप हलक्यात घेता येणार नाहीत. तसे झाल्यास लोकशाही उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी असलेल्यांकडूनच अशाप्रकारे कायद्याचे उल्लंघन होऊ लागल्यास ते अत्यंत धोकादायक ठरणार आहे, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.
रामा यांच्या सदर वक्तव्यानंतर जारी केलेल्या पत्रकातून चोडणकर यांनी वरीलप्रमाणे मत व्यक्त केले आहे. या पत्रकात पुढे त्यांनी, एखाद्या सरकारवर असे आरोप होत असताना ते सरकार आपण लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा कसा करू शकते? असा सवाल उपस्थित केला आहे. याप्रश्नी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य करावे आणि जनतेच्या रोषाला प्रतिसाद द्यावा, अशी मागणी केली आहे.
हा तर भाजपवरील विश्वासार्हतेला तडा : पाटकर
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी याप्रश्नी बोलताना, काणकोणकर यांच्या धक्कादायक विधानामुळे खळबळ उडाली असून भाजपावरील विश्वासार्हता, नैतिकता ढासळली असल्याचे म्हटले आहे. अशावेळी मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री त्या पदांवर राहिल्यास मुक्त आणि निष्पक्ष चौकशीत अडथळा निर्माण होण्याची भीती पाटकर यांनी व्यक्त केली आहे. भाजप सरकार आता मौन आणि नकारात्मतेची ढाल वापरू शकत नाही. नागरिकांना कारणे नव्हे तर उत्तरे मिळायला हवीत, अशावेळी हे सरकार कठोर कारवाई करण्यात अपयशी ठरल्यास काँग्रेस पक्ष भाजपचा अहंकार, नैतिक दिवाळखोरी आणि धनदांडग्यांना संरक्षण देण्याच्या त्यांच्या कायमच्या प्रयत्नांचा भांडाफोड करेल, असे पाटकर यांनी म्हटले आहे.









