लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीतर्फे राजर्षी शाहू स्मारकमध्ये आयोजन; महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन; विद्यार्थी, विद्यार्थिंनीसह सर्वांना मुक्त प्रवेश
कोल्हापूर प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीच्या वतीने अकोल्याच्या (कै.) जयंत सहस्त्रबुध्दे यांनी साकारलेल्या ‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आज (दि. 23) दुपारी चार वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 23 ते 26 ऑगस्ट दरम्यान हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 7 यावेळेत पाहण्याची संधी अबालवृद्धांना लाभणार आहे.
लोकमान्य को-ऑप मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी नव्या पिढीपर्यंत स्वातंत्र्यसेनानींची, स्वातंत्र्यसैनिकांची माहिती पोहचावी, या उदात्त हेतुने ‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ प्रदर्शन जास्तीत जास्त ठिकाणी भरवण्याचा मानस केला आहे. लोकमान्यतर्फे आजपर्यंत राज्यात विविध ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. आता दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे 23 ते 26 ऑगस्ट दरम्यान हे प्रदर्शन पाहण्याची संधी कोल्हापूरकारांना मिळणार आहे. प्रदर्शनाला सर्व नागरिकांसह शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिंनी, पालक आणि लोकमान्यचे ग्राहक, सभासद, हितचिंतक यांनी भेट देवून स्वातंत्र्यसैनिकांविषयीची माहिती घ्यावी, असे आवाहन लोकमान्य को-ऑप मल्टीपर्पज सोसायटीचे क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप पाटील-वाकरेकर यांनी केले आहे.
(कै.) जयंत सहस्त्रबुद्धे यांचे योगदान
अकोल्याच्या (कै.) जयंत सहस्त्रबुध्दे यांनी काही वर्षांपूर्वी ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीविरूध्द लढा दिलेल्या स्वातंत्रसेनानींची सचित्र माहिती जमा करण्याचा निश्चय केला. त्यांनी देशभर फिरून स्वातंत्र्यसैनिकांची माहिती आणि दुर्मीळ छायाचित्रे गोळा केली. प्रचंड मेहनतीने त्यांनी अमूल्य असा संग्रह उभारला. स्वातंत्र्याची चित्रगाथा या शीर्षकाखाली त्यांनी नव्या पिढीला हा संग्रहरूपी ऐतिहासिक ठेवा प्रदर्शनाच्या निमित्ताने खुला करून दिला. यामध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या हजारो लाखो ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी, स्वातंत्र्यसेनानींनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, घरादारावर तुळसीपत्र ठेवून त्याग केला. त्यांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. सहस्त्रबुद्धे यांच्या निधनानंतर हे प्रदर्शन लोकमान्यच्या पुढाकाराने राज्यभर दाखविण्यात येते. आजच्या पिढीला आपल्या पूर्वज असणाऱया स्वातंत्र्यवीरांनी जो त्याग केला, त्यातून प्रेरणा मिळावी, या हेतूने लोकमान्य सोसायटीने प्रदर्शनाचा उपक्रम सुरू केला आहे. त्याचा लाभ तमाम करवीरकरांनी घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.









