कोल्हापूर : प्रतिनिधी
साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसाचे 400 रुपये द्यावेत यासाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून शेतकरी संघटना 22 व्या ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज पासून 22 दिवस आक्रोश पदयात्रा सुरु केले असून आज पासून शिरोळ मधील दत्त कारखाना येथून सुरू झालेलं ही पदयात्रा कोल्हापूर जिल्ह्यातील 37 कारखान्यांवर जाणार असून राजू शेट्टी स्वतः 22 दिवस तब्बल 522 किलोमीटर चालत जाणार आहेत. तसेच गेल्या वर्षीचे 400 रुपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही असा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे.
22 व्या ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर 22 दिवस आत्मक्लेष:
काही दिवसांपूर्वी साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढत साखर कारखान्यांनी 2 ऑक्टोबरच्या आत गेल्या वर्षीच्या ऊसाला दुसरा हप्ता चारशे रुपये द्या असे मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली होती मात्र या मागणीकडे साखर कारखान्यांनी दुर्लक्ष केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाले आहे या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून साखर कारखानदारांच्या दारात जात आक्रोश मोर्चा काढत असून 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखानदारांच्या दारात पायी चालत जात जात आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत गाळप हंगाम सुरू होऊ देणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. दरम्यान या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले असून ठिकठिकाणी राजू शेट्टी यांचा जंगी स्वागत केलं जातं आहे.
कसं असणार आहे आंदोलन?:
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हे आंदोल सुरू असून 22 व्या ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर तब्बल 22 दिवस हे आत्मक्लेष आंदोलन चालणार आहे. आंदोलनाची सुरुवात आज पासून शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखाना येथून सुरू झाली असून पुढे गुरूदत्त, जवाहर, शाहू, सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना, संताजी घोरपडे, बिद्री, भोगावती, कुंभी कासारी, दालमिया, वारणा, बांबवडे, चिखली, निनाईदेवी, वाटेगाव, कृष्णा, राजारामबापू, जी डी बापू लाड, वाळवा हुतात्मा, सांगली सहकारी, सर्वोदय, शरद, पंचगंगा साखर कारखाना करत तब्बल 522 किलोमीटर अंतर चालून ही यात्रा 07 नोव्हेंबर रोजी थेट जयसिंगपूर येथील 22 व्या ऊस परिषदेला पोहोचणार आहे.








