मोर्चात मोठय़ाप्रमाणात कायकर्ते सहभागी होणार : म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार
प्रतिनिधी /खानापूर
गेली 65 वर्षे सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लोकशाहीच्या मार्गाने लढे देत असताना कर्नाटक सरकारने जुलूमांचा कळस गाठला आहे. असे असताना सांगली जिल्हय़ातील जत्त तालुक्यातील काही गावे भीषण पाणीटंचाईला तोंड देत असताना कर्नाटकात जाण्याचा विचार व्यक्त केला होता. त्याचा आधार घेत कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी जत्त, अक्कलकोट, सोलापूर या ठिकाणी आपला हक्क सांगितला आहे. हे हास्यास्पद आहे. तसेच सोमवारच्या चाबूक मोर्चात मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे वक्तव्य प्रकाश चव्हाण यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले.
शिवाजी महाराज हे जागतिक आदर्श असून त्यांचा अवमान करणारे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि प्रवक्ते सुंधाशू त्रिवेदी यांच्यावतीने निषेध करण्यात आला. येथील शिवस्मारकात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शंकरराव पाटील होते.
कुटिल कारस्थान जाणीवपूर्वक
विलास बेळगावकर म्हणाले, राज्य पुनर्रचना झाल्यानंतर बहुभाषिक भाग कर्नाटकात डांबण्यात आला. गेली 65 वर्षे कर्नाटक सरकार 865 गावांतील मराठी भाषा संपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. पोलिसांची दंडुकेशाही तर नित्याचीच झाली आहे. असे असताना महाराष्ट्रातील काही गावांवर कर्नाटकने आपला हक्क सांगणे म्हणजे जे दुसऱयाचे ते आपले म्हणण्यासारखे आहे. ते कुटिल कारस्थान जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. याप्रसंगी मारुती परमेकर, शंकरराव पाटील यांनी, आम्ही मायबोलीच्या राज्यात जाण्यासाठी गेली 65 वर्षे लढा देत आहोत. केंद्राने आणि महाराष्ट्र सरकारने आता प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी खंबीर भूमिका घेणे गरजेचे आहे, असे मत मांडले. यावेळी अरुण सरदेसाई, आबासाहेब दळवींसह अनेक कार्यकर्त्यांची निषेध करणारी भाषणे झाली. मुरलीधर पाटील, यशवंत बिरजे, सुनील पाटील, पांडुरंग सावंत, महादेव घाडी, अमृत पाटीलसह समिती कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शंकर गावडा यांनी आभार मानले
रिंगरोडसाठी सुपीक जमीन घेऊ नये
मध्यवर्ती समितीच्या रिंगरोड विरोधातील चाबूक मोर्चात खानापूर म. ए. समितीने पाठिंबा दिला असून तालुक्यातील समिती कार्यकर्त्यांनी या चाबूक मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. गर्लगुंजी येथून होणाऱया नवीन रेल्वेमार्गात सुपीक जमिनी घेऊ नये, असे म्हणून या लढय़ाला पाठिंबा व्यक्त करण्यात आला.









