बेळगाव : कर्करोगाच्या आजाराला कंटाळून नियोजित वधूने मुंबईत आत्महत्या केल्याच्या धक्क्यातून उत्तरप्रदेशमधील एका तरुणाने बेळगावात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी चिरागनगर येथे घडली आहे. आवेश जुबेर पठाण (वय 22) रा. गौरीहरा-फत्तेहपूर, उत्तरप्रदेश असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. खंजर गल्लीजवळील चिरागनगर परिसरात आपण रहात असलेल्या खोलीत आवेशने गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षांपासून आवेश बेळगावात रहात होता. आपल्या वडिलांबरोबर तो कापड विक्री करायचा. उत्तरप्रदेशमधील एका तरुणीबरोबर त्याचे लग्न ठरले होते. ती कर्करोगाने ग्रस्त असल्याचे समजले. तिला उपचारासाठी कुटुंबीयांनी मुंबईत आणले होते. तिचा आजार शेवटच्या टप्प्यात आहे, हे लक्षात आल्यानंतर तिने मुंबईत आपले जीवन संपविले. नियोजित वधूने आत्महत्या केल्याचे समजताच रविवारपासून आवेश सैरभैर झाला होता. त्याचे वडील त्याला सावरत होते. काही तरी बरेवाईट होईल, या भीतीने वडील त्याच्यासोबतच होते. सोमवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास जेवण आणण्यासाठी ते आपण रहात असलेल्या खोलीबाहेर गेले. जेवण घेऊन ते परत येईपर्यंत आवेशने आत्महत्या केली होती. दोरी कापून त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. तेथे पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
Previous Articleहिंडलगा कारागृहात कैद्याचा वॉर्डरवर हल्ला
Next Article सोमवारी सायंकाळपासूनच जमावबंदी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









