पुणे / प्रतिनिधी :
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या संगणकीय प्रणालीवर अतिरिक्त भार येत असल्याने, पालकांना प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत. या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासंदर्भात कोणतीही काळजी करू नये, त्यांना प्रवेशासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. येत्या शैक्षणिक वर्षासाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरू असून, 5 एप्रिलला लॉटरी काढण्यात आली. प्रवेशाच्या निवड यादीमध्ये नाव जाहीर झालेल्या मुलांच्या पालकांनी 25 एप्रिलपर्यंत पंचायत समिती, महानगरपालिका स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासायची आहेत. त्यानंतर आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करायचा आहे. पालकांनी शाळेत प्रवेश घेण्यासाठी 30 एप्रिलपर्यत मुदत आहे. मात्र, आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या संगणकीय प्रणालीवर अतिरिक्त भार येत असल्याने, आरटीई पोर्टल अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे पालकांना प्रवेश निश्चित करण्याची कार्यवाही करता येत नसल्याचे समोर आले आहे.
आरटीई पोर्टल तांत्रिक अडचणी येत असल्याने, पालकांना आपल्या मुलाच्या प्रवेशाबाबत माहिती जाणून घेता येत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पालकांनी कोणतीही भिती, संभ्रम बाळगू नये, ज्या बालकांची प्रवेशासाठी सोडतीद्वारे निवड झाली आहे, अशा बालकांना शाळा प्रवेशाकरिता पुरेसा कालावधी देण्यात येणार आहे, असे गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
अधिक वाचा : विदर्भाला ‘यलो अलर्ट’; कमाल तापमान घटणार
या प्रवेश प्रक्रियेत प्रवेश जाहीर झालेल्या 94 हजार 700 मुलांपैकी केवळ 271 मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. पालकांनी अधिक माहितीसाठी आरटीई पोर्टलवर संपर्क साधण्याचे आवाहन गोसावी यांनी यावेळी केले.








