राजस्थानातील भरतपूर जिल्हा हा त्यातील गड आणि पक्षी विहार यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. पण त्याची प्रसिद्धी तेथील वैशिष्ट्यापूर्ण मिठायांमुळेही आहे. भरतपूर शहराच्या गल्ल्यांमध्ये एक विचित्र नावाची मिठाई मिळते, जिचे नाव ‘पलंगतोड’ असे आहे. हे नाव कानावर पडताच लोकांच्या चेहऱ्यावर एक मिश्कील हास्य उमटते. या मिठाईची चव किंवा गुणवत्तेपेक्षा ती या नावामुळेच अधिक खपते, असेही बोलले जाते. मात्र, काही ‘अनुभवीं’च्या मते या मिठाईचे गुणधर्म तिच्या नावाप्रमाणे आहेत. आता यातील खरे काय आणि खोटे काय, सांगता येणे कठीण आहे. ही मिठाई दूध, खवा आणि साजूक तूप या पारंपारिक पदार्थांपासूनच बनविली जाते. ती दिसायला तर आकर्षक आहेच, परंतु तिचा स्वादही अनेकांना अत्यंत आवडतो. तिची बनावट आणि सजावट, तिच्याकडे पटकन् लक्ष जाईल, अशा प्रकारेच करण्यात आलेली असते. कुलदीप खंडेलवाल नामक व्यापारी हे या मिठाईचे निर्माते आहेत. या मिठाईचे नाव हास्य निर्माण करणारे असले तरी ती बनविण्याची कृती आणि प्रक्रिया मात्र एक गंभीर विषय आहे, असे खंडेलवाल यांचे म्हणणे आहे. ती बनविण्यासाठी अनुभव आणि कष्ट यांची आवश्यकता आहे. त्यामुळे तिचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात करता येत नाही. कारण तिची चव आणि स्वाद यांच्याशी तडजोड केली जाऊ शकत नाही. ती एकदा चाखल्यानंतर तिची आठवण सदैव लक्षात राहते, असेही खंडेलवाल यांचे प्रतिपादन आहे.
Previous Articleविविध ठिकाणी आज वीजपुरवठा खंडित
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









