6 जानेवारीपासून अन्नोत्सवाला सुरुवात : देशाच्या विविध भागातून येणारे दोनशेहून अधिक स्टॉल सहभागी होणार
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावकरांच्या दृष्टीने एक अतिशय भव्य असा उपक्रम दरवर्षी रोटरी क्लब बेळगावतर्फे आयोजित केला जातो तो म्हणजे अन्नोत्सव. कोरोनामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा होणारा अन्नोत्सव हा 6 ते 15 जानेवारी यादरम्यान अंगडी इंजिनिअरिंग कॉलेज सावगाव समोरील मैदानावर होणार आहे. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष रो. बसवराज विभूती व सचिव रो. अक्षय कुलकर्णी यांनी दिली.
अन्नोत्सवाबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, अन्न ही प्रत्येकाची गरज आहे आणि वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या प्रकारची खाण्यापिण्याची आवड असते. बेळगावात सर्व समाजाचे आणि देशाच्या विविध भागातून आलेले लोक राहात असल्याने त्यांच्या खाण्यापिण्याची आवड सुद्धा वेगवेगळी आहे. या सर्व समाजाच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्या आवडीनुसार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 1997 साली रोटरी क्लबने सर्वप्रथम ‘अन्नोत्सव’ उपक्रमाची सुरुवात केली. गेली 25 वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमाने यशाची उंची गाठत अन्नोत्सवला एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले आहे.
संजीव कपूर, विठ्ठल कामत, विष्णू मनोहर, सई ताम्हणकर, गायक अमिता गुप्ता यासारख्या प्रख्यात सेलिब्रिटीजनी भेट देवून आजवर अन्नोत्सवाचे कौतुक केले आहे. अन्नोत्सव हा जरी रोटरी क्लबचा उपक्रम असला तरी बेळगावकरांच्या आवडीचा तो उत्सव झाला आहे. या उत्सवात देशाच्या विविध भागातून येणारे दोनशेहून अधिक स्टॉल सहभागी होणार असून त्यामध्ये काश्मीरपासून जयपूरपर्यंत, गोवा, कोल्हापूर, सातारा, पुणे, नवी दिल्ली येथील प्रख्यात खाद्यपदार्थांचे स्टॉल सहभागी होणार आहेत.
अन्नोत्सवातून मिळणारा निधी शहरातील कामासाठीच खर्च
याशिवाय स्टॉल ओनरसाठी वेगळी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वात मोठी एलईडी स्क्रीन बरोबरच 15 मोठे कियॉक्स बसवले जाणार आहेत. स्त्राr आणि पुरुषांसाठी वेगवेगळी प्रसाधन व्यवस्था करण्यात येणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण काळजी घेतली जाणार आहे. अनुच्छवांमधून येणारा निधी आजवर रोटरी क्लबने शाळा, स्वच्छतागृहृ अॅम्बुलन्स, नेत्रपेढी, त्वचापेढी, डायलिसिस केंद्र, पोलिओ व्हॅक्सिनसाठी रेफ्रिजरेटर आणि आर्टिफिशियल लिम्बससाठी अर्थसाहाय्य केले आहे. यंदाच्या या अन्नोत्सवातून मिळणारा निधी शहरातील विविध कामासाठीच खर्च करणार आहेत.
दररोज सुमारे 15000 नागरिक भेट देण्याची आशा
अनेक लोकोपयोगी उपक्रम त्यातून राबवले जाणार आहेत. अशी माहितीही यावेळी देण्यात आली. दररोज सुमारे 15000 नागरिक भेट देतील, अशी अपेक्षा असून दहा दिवसात दीड ते दोन लाख लोक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. गेली दोन वर्षे खंड पडला होता. त्यामुळे यंदाचा अन्नोत्सव आगळावेगळा आणि लक्षात राहण्यासारखा होईल, अशा विश्वास रोटरी अध्यक्षांनी व्यक्त केला आहे. स्टॉल नोंदणीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाबद्दलच्या सर्व नियमांचे पालन करणार
अन्नोत्सवामध्ये कोरोनाबद्दलच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. तसेच या दहा दिवसांत रोज गाण्यांचा कार्यक्रम, डान्स, संस्कृत स्पर्धा अशा अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन यावेळी करण्यात आले आहे.
नामांकित प्रसिद्ध व्यक्तींचा सहभाग
या उत्सवात विविध क्षेत्रातील नामांकित प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होणार असून हा उत्सव यशस्वी करण्यासाठी रोटरीचे सर्व सदस्य जोमाने कामाला लागले आहेत.
अन्नोत्सवाचे यंदाचे 25 वे वर्ष
यंदाचे अन्नोत्सवाचे 25 वे वर्ष असून या इव्हेंटचे चेअरमन म्हणून रो. पराग भंडारे, रो. योगेश कुलकर्णी आणि रो. मनोज पै हे सातत्याने कार्यरत आहेत. यावर्षी अन्नोत्सवामध्ये 200 स्टॉल्स बरोबरच भव्य अशा स्टेजची उभारणी करण्यात येणार आहे. स्टेजवर रोज वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. नागरिकांनी केलेल्या सूचना लक्षात घेवून यावर्षी पार्किंगसाठी भव्य अशी सोय करण्यात आली आहे. तेथे सुमारे 800 कार आणि हजारो दुचाकी ठेवण्याची सोय होईल.









