नायब तहसिलदार गौरी कट्टे यांचे प्रतिपादन
तोंडवली येथील श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा पदवीदान समारंभ
तळेरे
विद्यार्थांना त्यांच्या जीवनामध्ये अनेक संधी मिळत असतात. मिळालेल्या संधी आपण ओळखायला शिकल्या पाहिजेत तरच पुढे जाऊन उच्च पद,असो वा इच्छित ध्येय गाठू शकतो.शिक्षण घेत असतांना स्पर्धा परीक्षेत सुध्दा लक्ष केंद्रित करून अभ्यास केला पाहीजे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी कठोर मेहनत तितकीच महत्वाची असते असे प्रतिपादन कणकवलीच्या नायब तहसीलदार गौरी कट्टे यांनी केले.
त्या तोंडवली येथील श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या पदवीदान समारंभात विद्यार्थांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.यावेळी समारंभाची सुरुवात गौरी कट्टे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी शासकीय औषधनिर्माणशास्त्र रत्नागिरीचे विभाग प्रमुख डाॅ. राजेश काने, संस्थाध्यक्ष वसंत सावंत, सचिव निखील सावंत, प्रशासकीय अधिकारी विनायक चव्हाण, प्राचार्य तुकाराम केदार आदींसह प्राध्यापक उपस्थित होते.
पुढे बोलताना श्रीम.कट्टे म्हणाल्या, आपण आज पदवी प्राप्त केल्यानंतर जीवनात पुढे जाताना यशस्वी होणारच आहात, मात्र मेहनत करणे सोडू नका. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचे महत्व सांगून आपला अनुभव बोलून दाखवत स्पर्धा परिक्षाविषयी मार्गदर्शन केले.
डाॅ.काने म्हणाले, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर इतरांविषयी कृतज्ञता भाव जपने महत्वाचे असून नुसती पदवी प्राप्त न करता उच्च शिक्षण घेण्याच्या संधी विषयीचे महत्व सांगितले.तर सचिव सावंत यांनी जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्या नतंर आपल्या जीवनात कसा बदल होतो याचे महत्व विशद केले.
दरम्यान सर्व मान्यवरांकडून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने दिलेले पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले. यावेळेस उपस्थित मान्यवरांचे सत्कार करीत दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला.यावेळेस मोठया संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सिल्वी गोन्सालवीस व आभार प्रा.अनुराधा भोई यानी मानले.









