कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
दहावी–बारावीची परीक्षा झाली की लगेच पुढील शिक्षणासाठी धावपळ सुरू होते. इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडीकल, तंत्रनिकेतन, आयटीआय यासह अन्य व्यवसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. यामध्ये तहसील कार्यालयातून जातीचा व उत्त्पन्नाचा दाखला, जातपडताळणी समितीकडून व्हॅलिडीटी, आधार कार्ड यासह सध्या सरकारने सुरू केलेले अपार कार्ड अन्य कागदपत्रे गोळा करण्यास ऐनवेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच कागदपत्रांची जुळवा–जुळव करावी, असे आवाहन शिक्षण तज्ञांसह महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोल्हापुरात इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडीकल, तंत्रनिकेतन, आयटीआय, कृषी तंत्र, पॅरा मेडिकल यासह अन्य सर्व अभ्यासक्रमांची कॉलेजस आहेत.
प्रवेशासाठी आणखी दोन महिने वेळ असल्याने या वेळेत संबंधीत कागदपत्रे पूर्ण होवू शकतात. प्रवेश घेताना एकाचवेळी सर्व विद्यार्थी कागदपत्रांसाठी अर्ज करतात. त्यामुळे वेबसाईट हँग होत असल्याने वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. मग टोकन घेवून प्रवेश पूर्ण करा यासाठी आंदोलन करण्यासारख्या घटना यापुर्वी घडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करून उत्पन्नाचा, जातीचा दाखला आणि जात पडताळणीचे प्रमाणपत्र काढून ठेवावे. सरकारकडून सध्या 12 लाखपर्यंत उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्याला शिक्षण शुल्कात सवलत दिली जात आहे.
सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांनीही प्रवेशासाठी लागणारी सर्व कागदपत्रे पूर्ण केली पाहिजेत. शासनानेही सध्या येणारे सर्व नवीन अर्ज वेळेत निर्गमीत करावे. कारण दहावी–बारावीचा निकाल 15 मे पुर्वी जाहीर करणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे.
दहावी–बारावीनंतर पुढे कोणते शिक्षण घ्यायचे यासंदर्भात चर्चा सुरू होते. तर काही विद्यार्थ्यांनी पुर्वीपासूनच कोणते शिक्षण घ्यायचे हे ठरवलेले असते. दहावीनंतर काहीजण तंत्रनिकेतन, अकरावी, आयटीआय, कृषी तंत्रज्ञान पदविका किंवा पॅरामेडीकल अशा अभ्यासक्रमाला अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. तर बारावीनंतर अभियांत्रिकी, मेडीकल, बीबीए, बीसीएस फार्मसी, कृषी महाविद्यालय अशा अनेक व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. सध्या या परीक्षांच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्याचा माहोल आहे.
सीईटी झाली असून नीट परीक्षांची तयारी विद्यार्थी करीत आहेत. पाल्याने बारा महिने अभ्यास करावा, अशी अपेक्षा करणाऱ्या पालकांनी प्रवेशासाठी लागणारी पूरक कागदपत्रे वेळेत पूर्ण करणे पालकांचेही कर्तव्य आहे.
- जातीच्या दाखल्यासाठी लागणारे पुरावे
एससी प्रवर्गासाठी : 1950 पुर्वीचा पुरावा
व्हीजीएनटी प्रवर्गासाठी : 1961 पुर्वीचा पुरावा
ओबीसी प्रवर्गासाठी : 67 पुर्वीचा पुरावा
- 31 मार्चपर्यंत पूरक कागदपत्रे सादर करावी
जातीच्या दाखल्यासाठी ऑनलाईन अर्ज करून पूरक कागदपत्रे अपलोड करावी. त्याची एक प्रत 31 मार्चपर्यंत जातपडताळणी कार्यालयाकडे जमा करावी. तसेच कोणत्या वर्गात प्रवेश घ्यावयाचा असून यापुर्वी कोठे प्रवेश होता याचीही कागदपत्रे सादर करावीत. आरक्षणातून प्रवेश घेण्याऱ्यांनी वेळीच प्रस्ताव सादर केले तर जातपडताळणी कार्यालयाला वेळेत निर्णय घेणे सोपे होईल.
उमेश घुले (उपायुक्त, जातपडताळणी कार्यालय कोल्हापूर








