पुणे / प्रतिनिधी :
शपथविधी होऊन 35 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले, तरीही मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर विस्तार करू, हे सांगणे आता बंद करावे, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी येथे लगावला. पूर्वी महाराष्ट्रात सारे निर्णय व्हायचे. आता या मंडळींना उठसूठ दिल्लीत जावे लागते, अशी टोमणेबाजीही त्यांनी केली.
अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोमवार पेठेतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर टीका केली. पवार म्हणाले, पुणेकरांनी पाच वर्षे भाजपाचा कारभार पाहिला आहे. मीही अडीच वर्षे पालकमंत्री होतो. मी आपले पुणे, आपला जिल्हा म्हणून काय केले, हे पुणेकरांनी पाहिले आहे. उद्याची 50 वर्षे डोळय़ासमोर ठेऊन पुण्याचे नियोजन केले. मात्र, आता तर महिना झाला तरी पालकमंत्री नाही, मंत्रिमंडळ नाही. सरकारकडून जनतेच्या हिताच्या दृष्टीने जे निर्णय घ्यायचे ते निर्णय घेतले जात नाहीत. त्यामुळे आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करा, असे सांगत आहोत. मात्र, लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांना अधिकार नाहीत. याबाबत शिंदेंनी उत्तर द्यायला हवे. दिल्लीवारी केल्याशिवाय मंत्रिमंडळ अस्तिवात येणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्तार थांबवल्याचे आता समोर येत आहे,
मंत्री नसल्याचा सर्वसामान्यांना फटका
मीडिया यांना विचारतो, कधी? हे म्हणतात लवकरच, लवकरच, लवकरच. आम्ही दोघे आहोत, आम्ही दोघे आहोत. मला त्या दोघांच्यावर टीका करायची नाही. या दोघांच्या हातात काही नाही. दिल्लीत सर्व ठरते. पूर्वी निर्णय महाराष्ट्रात होत होते, असा टोला त्यांनी लगावला. तर अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्याशिवाय अंकुश निर्माण होत नाही. मंत्री नसल्याने पुढचे निर्णय घेता येत नाहीत. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो, याकडेही अजितदादांनी लक्ष वेधले.








