ऑनलाईन टीम / तरुण भारत :
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तुरुंगात शिकलेली षंढ, नामर्द अशी भाषा वापरून चिथावणी आणि आव्हान देणे बंद करावे. अन्यथा संयम सुटेल आणि भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिला.
बावनकुळे म्हणाले, संजय राऊत यांनी आव्हाने देऊन राजकीय वातावरण खराब करू नये आणि सामाजिक वातावरण बिघडवू नये. अन्यथा लोकांचा संयम सुटेल. यातून उद्या उदेक झाला तर थांबविता येणार नाही. कोणत्याही नेत्याचा व्यक्तिगत अपमान होईल, असे वक्तव्य राऊत यांनी करु नये. मर्दानगी काढणे, नालायक म्हणणे हे महाराष्ट्र सहन करणार नाही. राऊत यांनी चिथावणी देणे बंद करावे. नाही तर त्यांच्या बोलण्याचा उलटा परिणाम होईल.
अधिक वाचा : भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवली; दिल्ली महापालिकेत ‘आप’चे सरकार
दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर न्यायालयातच तोडगा निघेल. हे माहिती असूनही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीमाभागात जाणार असल्याचे जाहीर करणे शोभत नाही. त्यांना सीमाभागात जायचे होते तर ते आधी का गेले नाहीत, असा प्रश्नही बावनकुळे यांनी उपस्थित केला.








